शेतमालाची हमी भावाने खरेदी करा!
शिवसेनेने दिले मेहकर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
बुलडाणा, दि. 24, ऑक्टोबर - सध्या शेतकर्यांचे माल घरी आले आहेत. ऐन हंगामात असलेली पावसाची कमतरता आणि त्यानंतर ऐन मालाच्या सुगीत झालेली अतिवृष्टीने शेतक र्यांचे कंबरडे अगोदरच मोडले असताना त्यातच व्यापार्यांमार्फत शेतकर्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. अशा या आसमानी आणि सुलतानी संकटांनी शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांच्या शेतमालाला मुळीच भाव नाही.बाजारामध्ये कापूस 3000 रुपये प्रतिक्वींटल, सोयाबीन 1800 ते 2400 रुपये प्रतिक्वींटल तसेच उडीद व मुग याही पिकांना भाव नसुन मागील हंगामात नाफेडला विक्री केलेल्या तुरीचे चुकारे अजूनपर्यंत बाकी आहेत. व्यापार्यांकडून शेतकरी हैरान झाले आहेत. मुख्यमंत्री हमी भावापेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असे जाहीर करुनसुद्धा अद्यापपर्यंत एकाही व्यापार्यावर गुन्हा दाखल झाला नाही.
शासनामार्फत अथवा सी.सी.आय.पणन महामंडळ तसेच सरकारी संस्थाद्वारे हमी भावाने शेतकर्यांचे कापूस, सोयाबीन, उडीद, मुग हा शेतमाल खरेदी करण्यात यावा. खरेदी केंद्र शासनाकडून सुरु करण्यात यावे व शेतकर्यांची आर्थिक विवंचनेतून सुटका करावी. शेतकर्यांचे मागील वर्षी जाहीर केलेले प्रति क्विंटल 200 रुपयांचे अनुदान तात्काळ देण्यात यावे. आदी मागण्या सदर निवेदनात असून निवेदन देताना खा.प्रतापराव जाधव, सुरेश वाळुकर, राजेंद्र गाडेकर, ॠषी जाधव, आशिष रहाटे, माधवराव जाधव, संजुभाऊ जाधव, जयचंद बाठिया, पी.आर.देशमुख, राजु घनवट, अशोक पसरटे, संदीप देशमुख, कैलास खंदारे, प्र्रमोद काळे, मदन चनखोरे, भुजंग म्हस्के, साहेबराव हिवाळे, मनोज जाधव, रामेश्वर भिसे, विकास जोशी, तौफिक कुरेशी आदींसह शेकडो शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.