Breaking News

मुंबईसह महानगरांत भारनियमन सुरु

मुंबई, दि. 06, ऑक्टोबर - वीजटंचाईमुळे ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्व महानगरांमध्येही तातडीचं भारनियमन सुरु झालं आहे. त्यामुळे ऐन ऑक्टोबर हिटमध्ये नागरिकांना  भारनियमनाचा शॉक बसत आहे. शहरी भागात तीन तास तर ग्रामीण भागात नऊ तासांपर्यंत भारनियमन करण्यात येत आहे.
भांडूप, मुलुंड, नवी मुंबई, ठाणे, कळवा, मुंब्रा, दिव्यातही रोज सव्वा तीन ते सात तास वीज भारनियमन लागू करण्यात आलं आहे. गुरुवारी 5 ऑक्टोबरपासून हे  भारनियमन लागू झालं आहे. कोळसा उपलब्ध नसल्याने आणि विजेचा वापर वाढल्यामुळे राज्यात तातडीचं भारनियमन लागू करण्यात आलं आहे. दीड ते दोन हजार  मेगावॅटची तूट असल्याने महावितरणने हा निर्णय घेतला आहे.
राज्यात 2200 ते 2300 मेगावॉटचे भारनियमन होत असल्यानं, कृषीपंपांच्या वीजेतही दोन तासांची कपात करण्यात आली आहे.  भारनियमनाचं संकट वाढत आहे,  त्यामुळे दिवाळीवरही भारनियमनाचं सावट आहे. त्यामुळे मिळेल तेवढी महागडी वीज खरेदी करण्यासाठी महावितरण कंपनीची धावपळ सुरु आहे.