आता आणखी उशीर झाला तर आम्ही मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही- खा. सुप्रिया सुळे
पुणे, दि. 17, ऑक्टोबर - अहमदनगरमधील कोपर्डी बलात्कार आणि हत्येच्या घटनेने राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरून टाकले होते. या घटनेला दीड वर्ष पूर्ण होत आले तरी अद्याप या खटल्याचा निकाल लागला नाही. पीडितेला न्याय मिळाला नाही. आता आणखी उशीर झाला तर आम्ही मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही. असा सज्जड इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. कोपर्डीचा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याची मागणीही सुप्रिया सुळेंनी यावेळी केली आहे.’कोपर्डी प्रकरणाचा निकाल 1 वर्षाच्या आत लावला जाईल, नराधमांना फासापर्यंत पोहोचवल्याशिवाय शांत बसणार नाही,’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली होती. परंतु अद्याप या प्रकरणाचा निकाल लागला नाही. 1 जानेवारीपर्यंत या प्रकरणाचा निकाल न लागल्यास मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरु देणार नाही, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे.दरम्यान, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोपर्डीचा निकाल लागणे अपेक्षित आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे.