Breaking News

फेरीवाल्यांविरुद्ध लढण्यापेक्षा सीमेवर जाऊन लढा - रामदास आठवले

मुंबई, दि. 22, ऑक्टोबर - गोरगरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत त्यांच्यावर हल्ला करण्यापेक्षा मनसैनिकांनी लष्करात जाऊन सीमेवरती देशाच्या शत्रूंशी  लढावे. गरीब फेरीवाल्यांवर हल्ला झाला तर भीमसैनिक मनसैनिकांना चोख उत्तर देतील, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक  न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला.
फेरीवाल्यांमुळे होणार्‍या त्रासाबद्दलची तक्रार पोलीस आणि प्रशासनाला करता येऊ शकते. त्यांच्यावर प्रशासन कारवाई करेल मात्र मनसेने कायदा हातात  घेऊ नये. मनसैनिकांनी गरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत हल्ले करू नयेत. फेरीवाल्यांवर ज्या मनसैनिकांनी हल्ले केले. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई  करावी असे सांगत गरीब फेरीवाल्यांच्या रक्षणासाठी भीमसैनिक आणि आरपीआयचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशाराही आठवले यांनी दिला आहे.