Breaking News

एकता दौडचा फज्जा, भाजप नेत्यांचा केवळ पळण्याचा अभिनय

पुणे, दि. 01, नोव्हेंबर - सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आयोजित एकता दौडमध्ये हजारो शालेय विद्यार्थी धावले. मात्र भाजपचे मंत्री, खासदार आणि नेते मात्र या नेत्यांनी न  पळता केवळ पळण्याचा अभिनय केला आहे. या ’दौड’ची शहरात चर्चा रंगली आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली  आहे.
शहरातील खंडूजीबाबा चौक ते एसपी कॉलेज दरम्यान ही दौड आयोजित करण्यात आली होती. यामध्ये महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे,  शहराध्यक्ष गोगावले यांच्यासह अनेक नगरसेवक दौडमध्ये हजर होते. ते दौडमध्ये केवळ चालल्याने एकता दौडचा फज्जा उडाल्याची चर्चा नागरिक करत आहेत.
दरम्यान पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांच्या प्रश्‍नांबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली.  त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फसलेली शेतकरी कर्जमाफी योजना, दिखाऊ स्वच्छ भारत योजना, स्मार्ट सिटी योजनेचा उडालेला बोजवारा, निधीअभावी रखडलेली  संसद दत्तक ग्राम योजना अशा शब्दांत त्यांनी देवेंद्र सरकार आणि मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.