Breaking News

दीड लाख कर्जावरील व्याज माफ करा, हप्तेही पाडून द्या -शरद पवार

सोलापूर, दि. 22, ऑक्टोबर - राज्य शासनाने कर्जमाफी देण्याची घोषणा केली, त्यानुसार त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणीही सुरू केली, ही समाधानाची  गोष्ट आहे. खर्‍या अर्थाने ही योजना यशस्वी व्हायची असेल तर वास्तव लक्षात घेणे आवश्यक आहे. कर्जमाफीच्या प्रक्रियेत दीड लाखापर्यंतचे पीककर्ज माफ  केले, पण दीर्घ मुदतीचे पीककर्ज माफ करण्यासाठी अट घातली आहे. एकीकडे देशातील अनेक कुटुंबांकडे कोट्यवधी रुपयांची कर्जे थकीत असताना दीड  लाखावरील कर्ज भरण्यासाठी अट घातली जात आहे. दीर्घ मुदतीचे कर्ज घेतलेले अनेक शेतकरी अटीमुळे वंचित राहतील. त्यामुळे सरकारने दीड  लाखावरील दीर्घ मुदतीच्या कर्जाचे व्याज पूर्णपणे माफ करावे आणि दीड लाखापेक्षा अधिक कर्जाला पुढील 10 वर्षांचे हप्ते पाडून द्यावेत, अशी सूचना माजी  केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्य शासनाला केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बळीराम साठे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यानिमित्त वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत  होते. अध्यक्षस्थानी सहकारमंत्री सुभाष देशमुख होते. या वेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार शरद बनसोडे, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव  देशमुख, सत्कारमूर्ती बळीराम साठे, आमदार दिलीप सोपल, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्यासह आमदार, जि.प. सदस्य आदी उपस्थित होते.  साठे यांचा शरद पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
‘साठे यांना जिल्हा परिषद सभापती, उपाध्यक्ष, अध्यक्ष पदेही मिळाली, मात्र त्यांनी डोक्यात हवा जाऊ दिली नाही. अपयशातून ते मार्ग काढून यशस्वी  झाले. स्वत:साठी कधीही पदे मागितली नाहीत, मात्र या भागातील शेतकर्‍यांचे, नागरिकांचे प्रश्‍न मांडत राहिले, त्यांची सोडवणूक केली,’ असे साठेंबद्दल  गौरवोद्गार पवारांनी काढले.
कर्जमाफीची मागणीच न करण्यासाठी सरकार म्हणून शेतकर्‍यांच्या शेतमालास उत्पादन खर्च आधारित भाव द्या, मुबलक पाणी द्या, त्यांना खते-बियाणे,  नवीन तंत्रज्ञान दिल्यास अर्थव्यवस्थेला एक गती येईल. उत्तर तालुक्यातील द्राक्षांनी जगाच्या बाजारात नाव कमावले आहे, भविष्यात ही शिरापूर उपसा  सिंचन योजना पूर्ण झाल्यास उत्तर तालुक्यात मोठी क्रांती होईल, असा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला.