Breaking News

राज्यातील 200 ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये निवास व्यवस्था करण्याची योजना

पुणे, दि. 09, ऑक्टोबर - पर्यटकांना प्रत्यक्ष किल्ल्यामध्ये राहून तेथील इतिहास, संस्कृती आणि स्थापत्य यांची माहिती आनंद घेता यावा, या दृष्टीने राज्यातील  200 निवडक किल्ल्यांमध्ये निवास व्यवस्था उभी करण्याचे सूतोवाच राज्याच्या पर्यटनमंत्र्यांनी केले आहे. यासाठी केंद्रीय पुरातत्त्व खात्याशी समन्वय साधण्याची  तयारी दाखवण्यात आली आहे. त्यानुसार ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था झाली तर पर्यटनाला उत्तम चालना मिळू शकते. सोलापूरच्या  भुईकोट किल्ल्यात अशी व्यवस्था झाली तर शहर आणि पर्यटन विकासासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरू शकतो, असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.  परंतु, याचवेळी ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्याच्या मूळ बांधकामास धक्का लागणार नाही, मूळचे सौंदर्य नष्ट होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी येणार  असल्याकडे अनेक तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.राज्यात 350 हून अधिक ऐतिहासिक गड किल्ले आहेत. यातील काही किल्ले हे राज्याच्या तर काही केंद्राच्या पुरातत्त्व  खात्याच्या अधिकाराखाली आहेत. राज्यातील निवडक 200 ऐतिहासिक किल्ल्यांच्या यादीत सोलापूरच्या भुईकोट किल्ल्याचेही नाव असू शकते. सोलापूरचा किल्ला हा  केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अधीन आहे. त्यामुळे या किल्ल्यात कायमस्वरूपी बांधकामास परवानगी मिळू शकत नसल्याकडे सोलापूर विद्यापीठ पुरातत्त्व शास्त्र  विभागाच्या प्रमुख प्रा. माया पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
सोलापूर शहरात मध्यवर्ती भागात असणारा भुईकोट किल्ला हा दुहेरी तटबंदीचा आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणारा हा किल्ला आहे. किल्ल्याच्या  बांधणीपूर्वीपासून असलेले प्राचीन मल्लिकार्जुन मंदिर पडझड झालेल्या स्थितीत येथे आहे. या मंदिराचे अनेक चिरे, कोरीव दगड परिसरातील इमारतींमध्ये वापल्याचे  दिसून येतात. राज्यसरकारचा उपक्रम चांगला आहे. यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने परवानगी देणे आवश्यक आहे. सोलापुरातील किल्यात सपाटीकरण असून, तेथे  सुरक्षित निवास व्यवस्था उत्तमपणे होऊ शकते. वेगवेगळे विभाग एकत्र येऊन उपक्रम राबवावे, अशी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. त्यानुसार ही  संकल्पना होऊ शकते, असे सोलापूर किल्याचे अभ्यासक आर्किटेक्ट डॉ.सुधीर चव्हाण यांनी सांगितले.
सोलापूरचा भुईकोट किल्ला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने त्यामध्ये निवासव्यवस्थेची आवश्यकता नाही. सभोवातली राहण्यासाठी सोयी-सुविधा आहेत.  बांधकाम करताना आवश्यक नियम, तज्ज्ञांची मदत घेण्याची शक्यता कमी असून किल्याच्या मूळ सौंदर्याला बाधा येऊ शकते. फारच आवश्यकता असल्यास फक्त  पर्यटन सीझनमध्ये तात्पुरते तंबू निवास करावेत,असे सीमंतिनी चाफळकर यांनी सांगितले.