Breaking News

वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली

सांगली, दि. 01, सप्टेंबर - शिराळा तालुक्यातील वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून वारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला  आहे. वारणा धरणातून 13 हजार 50 क्युसेस विसर्ग करण्यात येत असल्याने वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. वारणा धरणात 34.40 टीएमसी  पाणीसाठा असून सांगली जिल्ह्यात 5.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 
वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावल्याने वारणा नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीवरील आरळा-  शित्तूर व चरण- सोंडोली हे दोन पूल पाण्याखाली गेले आहेत, तर काखे- मांगले व मांगले- सावर्डे या दोन पुल पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.  पावसाची संततधार कायम असल्यामुळे वारणा नदीकाठावरील गावांना पाटबंधारे विभागाच्यावतीने सतर्कतेचा आदेश देण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात इतरत्र पावसाचा जोर काहीसा मंदावला असला तरी वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. सांगली  जिल्ह्यात बुधवारपासून गुरूवारी सकाळपर्यंत सरासरी 5.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय आकडेवारी मिलीमीटरमध्ये पुढीलप्रमाणे मिरज  तालुका 2.9 मिलीमीटर, जत- 0.4, खानापूर- विटा 1, वाळवा- इस्लामपूर 9.5, तासगाव 2.3, शिराळा 24.7, आटपाडी 1.3, कवठेमहांकाळ 2.3, पलूस 3  व कडेगाव तालुक्यात 6.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
वारणा धरणात आजअखेर 34.40 टीएमसी पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टीएमसी इतकी असल्याचे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात  आले. सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात 98.35 टीएमसी इतका पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी, धोम धरणात 11.30 टीएमसी  पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टीएमसी, कन्हेर धरणात 9.56 टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टीएमसी, कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा  धरणात 23.74 टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 8.31 टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टीएमसी आहे.  अलमट्टी धरणात 119.57 टीएमसी पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टीएमसी आहे. वारणा धरणाच्या सांडवा, कालवा व विद्युतगृहाद्वारे 13 हजार 50  क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात आले.