Breaking News

मिरज शहरातील एटीएमवर दरोडा, सुरक्षारक्षकाचा खून

सांगली, दि. 28, सप्टेंबर - मिरज शहरातील पाण्याच्या टाकीजवळील बँक ऑफ इंडियाच्या एमटीएम लुटण्याच्या प्रयत्नात सुरक्षारक्षक राजाराम जाधव (वय 62)  याची निर्घृण हत्या मंगळवारी मध्यरात्रीनंतर झाली. दरोडेखोरांचा एटीएम लुटण्याचा प्रयत्न मात्र फसल्याचे आज बुधवारी सकाळी उघडकीस आला. 
मिरज- सांगली रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ काही अज्ञातांनी बँक ऑफ इंडियाचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न मंगळवारी मध्यरात्रीनंतर केला. याप्रकरणी काही  अज्ञातांविरोधात मिरज शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून या एमटीएमच्या सुरक्षारक्षकाचा खून करण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे. मिरज शहर पोलीस  अधिक तपास करीत असून सांगलीतून श्‍वानपथकाची मदतही घेतली जात आहे.
मिरज पंचायत समितीसमोरील शिवाजी रस्त्यावर असणा-या बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर राजाराम जाधव सुरक्षारक्षक म्हणून तैनात होते. एटीएमवर दरोडा  टाकण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनी एटीएम मशिन उचकटवले. त्याचवेळी राजाराम जाधव तिथे आल्याने त्या हल्लेखोरांना ही बाब खटकली व त्यांनी राजाराम जाधव  यांच्या डोक्यात वर्मी घाव घालून त्यांची हत्या केली असावी, असा अंदाज मिरज शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी राजाराम जाधव यांचा  मृतदेह एटीएम केंद्राच्या आत खुर्चीवर ठेवून पोबारा केला. बुधवारी सकाळी याच एटीएमवर हजर राहण्यासाठी दुसरा सुरक्षारक्षक आला असता ही घटना उघडकीस  आली. अज्ञात दोघा हल्लेखोरांकडून हा प्रकार झाल्याचे सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाले असून त्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस तपास करीत आहेत.