Breaking News

भारतीय अर्थव्यवस्था अमेरिकेने उध्वस्त केली; पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

नागपूर, दि. 26, सप्टेंबर -  गेल्यावर्षी झालेल्या नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. यामागे अमेरिकेचा हात होता व भारताची अर्थव्यवस्था  उद्ध्वस्त करण्यासाठीच हे षडयंत्र रचण्यात आले होते. काही उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या बोलण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी फसले. त्याचा फटका आता संपूर्ण देश भोगत  आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते आज, सोमवारी नागपुरात ते निवडक प्रसिद्ध माध्यमांशी बोलत होते.
यावेळी पंतप्रधानांवर टीका करताना चव्हाण म्हणाले की, मोदींना अर्थशास्त्राचे ज्ञान नाही. नोटाबंदीनंतर पैसे मोजण्यास मोठा कालावधी लागला. नोटाबंदीच्या काळात  मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा झाला. यात प्रचंड आर्थिक भ्रष्टाचार झाला, असा आरोप चव्हाण यांनी केला.
मोदींच्या प्रदेश दौर्‍यावर बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी ज्यावेळी परदेशात जातात तेव्हा भारतीय गोष्टींचे ‘मार्केटिंग’ त्यांनी करणे अपेक्षित  आहे. मात्र ते तेथे विक्रेते म्हणून न जाता खरेदीदार बनून जातात.अशा पद्धतीने परदेशात मोठमोठे करार होत असतील तर कुठलाही देश त्यांचे ‘रेड कार्पेट’ स्वागत  करेलच, अशी टीका चव्हाण यांनी केली.
यावेळी मोदींच्या कार्यशैलीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. संघाच्या मुशीतून तयार झालेले मोदी पंतप्रधान झाल्यावर  मात्र त्यांनाच भारी पडले आहेत. संघाच्या पदाधिकार्‍यांचे मोदी ऐकत नाहीत, त्यामुळे संघ नाराज आहे. राम माधव, विनय सहस्त्रबुद्धे यांना फेरबदलाच्या वेळी  मंत्रीमंडळात स्थान देण्यात यावे, अशा संघाचा आग्रह होता. मात्र मोदींनी त्यांना डावलले. त्यामुळे पुढील 2 वर्षात मोदींना शह देण्याचा संघाचा प्रयत्न राहणार आहे,  असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. निर्मला सितारमन यांना अनुभव नसतानादेखील संरक्षण मंत्रालयासारखे मोठे खाते कसे काय मिळाले, असा प्रश्‍न त्यांनी  उपस्थित केला. पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे परराष्ट्र खाते अक्षरश: पोलिसी खाक्याप्रमाणेच चालवत आहेत, असा टोला देखील त्यांनी लगावला.
केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढून घेण्यात आले असा आरोप चव्हाण यांनी केला. बुलेट ट्रेनमुळे  जपानमध्ये अक्षरश: बंद पडलेल्या कंपन्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. या ट्रेनमुळे आपल्या देशाचा कमी आणि जपानचाच जास्त फायदा आहे, असे चव्हाण  म्हणाले.
काँग्रेसला घरचा आहेर
यावेळी चव्हाण यांनी स्वपक्षावर देखील टीका केली. 2014 नंतर काँग्रेसचे अखिल भारतीय स्तरावरील महाअधिवेशन झालेले नाही, अशी माहिती दिली. काँग्रेस  रस्त्यांवरील आंदोलनात कमी पडत आहे. ‘सोशल मिडीया’वरील प्रचार-प्रसारातदेखील मागे पडत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.