Breaking News

‘पुन्हा घरी’ : सुसंवाद सहजीवनाचा ! - पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल

नाशिक, दि. 25, ऑगस्ट - अलिकडच्या काळात माणसाने विविध क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती साधली आहे. भौतिक आणि आर्थिक मानकांच्या आधारे माणसाच्या  विकासाचे मुल्यमापन होत असताना सामाजिक आणि भावनीक पातळीवर मात्र त्याच्यासमोर अनेक समस्या उभ्या राहिलेल्या दिसतात. माणसाचे परस्परांशी असलेले  नाते-सबंध, त्यामधील ताण, समस्या या विषयांवर मुक्त चर्चा होताना फारसे दिसत नाही. त्यामुळेच की काय, समस्येमध्ये आणखीनच भर पडते आहे.
प्रत्येक नात्याला अनेक पदर असतात. नाती आली की त्याच व्यवहारही ओघाने आलाच, हा व्यवहार विश्‍वासाचा, भावनेचा, विचारांचा, सहकार्याचा, समजून  घेण्याचा, समजून सांगण्याचा असतो. चांगल्या-वाईट माणसांना ओळखणे, ते जसे आहेत तसे त्यांना स्वीकारणे, आपल्या आयुष्यात त्यांना स्थान देणे आपल्याकडून  घडते का? याचे उत्तर नकारार्थी आहे.
‘पतीपत्नी’ या नात्यामध्ये एकूणच सर्व मानवी नात्यांचा सार आढळतो. त्यानूसार समज, गैरसमज, राग, लोभ, बरोबरी, तुलना, असूया, हेवेदावे अशी मानवी  नात्यातील समस्त प्रकारांची सरमिसळ होऊन पर्यायाने होणारी गुंतागुंत अटळ असते. या नात्याचा पाया ‘विश्‍वास, पारदर्शकता, प्रेम व वचनबद्धता’ या मूळ चार  स्तंभांवर आधारित असतो. त्यामुळे यातील एकजरी स्तंभ डगमला तर संसाराचा डोलारा कोसळायला सुरुवात होते. पतीपत्नीच्या पवित्र नात्यामध्ये नितळ  पारदर्शकता अपेक्षेपेक्षा गृहीतच जास्त धरलेली असते. वैवाहिक जीवनात सगळंच काही आलबेल असेलच असे नाही. हे जाणून वर्तनातील आणि स्वभावातील  लवचिकता महत्वाची असते.