Breaking News

राज्यात विविध अपघातात एका दिवसात 23 बळी

पुणे, दि. 29, ऑगस्ट - पुण्यातील नारायणगावजवळ एसटी आणि टेम्पोच्या धडकेत 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे या दुर्घटनेचमागचं प्रमुख  कारण रस्त्यांचं अपूर्ण बांधकाम काम हेच आहे. पुणे-नाशिक काल मध्यरात्री महामार्गावर त्र्यंबकेश्‍वर-पुणे या एसटीला ही दुर्घटना घडली. दुसरी गोष्ट म्हणजे रस्ते  अपूर्ण असले तरी या ठिकाणांहून टोलची वसुली मात्र पूर्णपणे आणि बिनचूक केली जाते.  आधी खड्डे आणि त्यानंतर आता अपूर्ण रस्ते लोकांच्या जीवावर बेतत  असल्याने लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पुणे-सातारा महामार्ग हा काळा डाग आहे, अशी कबुली कालच खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिली होती. त्याच्या काही तासातच म्हणजे काल  पुण्याजवळच्या शिंदेवाडीत एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात सुदैवाने कुणीही जखमी झालं नाही. मात्र या घटनेला 12 तासही होत नाहीत, तोच पुन्हा  अपघात होऊन 11 लोकांनी जीव गमावला आहे.
पुण्याबरोबरच नाशिक जिल्ह्यात झालेल्या दोन अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.  येवला- मनमाड रस्त्यावर काल संध्याकाळी झालेल्या तिहेरी अपघातात 8  जणांचा मृत्यू झाला. येवल्याच्या बाभूळगाव शिवारात क्रूझर गाडीचं टायर फुटून ती आधी समोरुन येणार्‍या मारुती ओम्नीवर आणि नंतर मागून येणार्‍या बसवर  आदळली. क्रूझरमधील लोक सारखपुड्याचा कार्यक्रम आटोपून आपल्या गावी म्हणजे धुळ्याकडे परतत होते. दुसरीकडे आज पहाटे मनमाड-मालेगाव जवळ अक्टिव्हा  गाडीला अज्ञात वाहनाने धडक दिली आहे. ज्यात प्रसिद्ध कांदा व्यापारी इंदर चोपडा यांचा मृत्यू झाला. तर त्यांचे कर्मचारी संजय ठुबे यांचाही उपचारादरम्यान मृत्यू  झाला.