Breaking News

मुख्यमंत्र्यांची ’ती’ भाषा म्हणजे लबाडाच्या घरचं जेवण : दादा भुसे

नंदुरबार, दि. 12 - कर्जमाफीसाठी ऑक्टोबरपर्यंत थांबण्याची मुख्यमंत्र्यांची भाषा म्हणजे लबाडाच्या घरचं जेवण अशी गत आहे, असे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे म्हणाले. शिवाय, अल्पभूधारकच नव्हे, तर सर्व शेतकर्‍यांची कर्जमाफी करा, अशी मागणीही भुसेंनी केली. नंदुरबारमध्ये शिवसेनेचा शेतकरी मेळावा भरला होता. त्यावेळी राज्यमंत्री दादा भुसे यांनी कर्जमाफीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा आहेर दिला.
शेतकरी संपादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अल्पभूधारक शेतकर्‍यांची ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफी करण्याचं आश्‍वासन दिलं. त्यानंतर सर्वांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
दरम्यान, राज्यमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधल्याने आता शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. आता भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं आहे.