Breaking News

पाकिस्तानचा पराभव, संपूर्ण देश सेलिब्रेशनसाठी रस्त्यावर

मुंबई, दि. 05 - पावसाच्या लपंडावानंतरही टीम इंडियाने चुरशीच्या लढतीत पाकिस्तानवर 124 धावांनी विजय मिळवला. पाकिस्तानचा अख्खा संघ भारताने केवळ  134 धावांमध्ये माघारी पाठवला. भारताने पाकिस्तानला विजयासाठी 324 धावांचं आव्हान दिलं होतं. या विजयानंतर संपूर्ण देश सेलिब्रेशन करत आहे.  वाराणसीमध्ये पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. तर मुंबईत क्रिकेटप्रेमींनी भारताच्या विजयानंतर एकच जल्लोष केला.
तिकडे नागपुरातही क्रिकेटप्रेमी सेलिब्रेशनसाठी चौकाचौकात जमले. मात्र पोलिसांनी सेलिब्रेशनला विरोध केला. तरीही क्रिकेटप्रेमींचा उत्साह कायम होता. राज्यभरातील  विविध शहरांमध्ये क्रिकेटप्रेमी सेलिब्रेशनसाठी एकत्र जमले आहेत. या महामुकाबल्यात भारतीय फलंदाजांनीही पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.  सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि युवराज सिंहनेही पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.
युवराजने 53, तर विराटने नाबाद 81 धावा ठोकल्या. युवराज बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्यानेही अखेरच्या षटकात हात धुवून घेतले. त्याने 6 चेंडूत 20  धावा ठोकल्या. याच खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर 3 बाद 319 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य ठेवलं आहे. डकवर्थ लुईसप्रमाणे पाकिस्तानला 48 षटकात  विजयासाठी 324 धावांचं आव्हान देण्यात आलं. पुन्हा पावसाने सामना थांबवण्याची वेळ आल्यानंतर हा सामना 41 षटकांचा करण्यात आला.
रोहित शर्माचं शतक केवळ 9 धावांनी हुकलं. तो 91 धावांवर बाद झाला. त्याआधी शिखर धवन शानदार अर्धशतक ठोकून 68 धावांवर माघारी परतला. तर युवराज  आणि विराटने अभेद्य भागीदारी रचली.