Breaking News

जालन्यातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा - अर्जून खोतकर

मुंबई, दि. 01 - जालना शहरातील प्रलंबित कामे तातडीने पुर्ण करा, असे निर्देश पशु व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. जालना शहर विकास आढावा बैठकीचे आयोजन आज मंत्रालयात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जालना जिल्ह्याच्या महापौर संगिता गोरंटेल, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अजय सिंह, जिल्हा प्रशासन अधिकारी केशव कानपुडे, सहाय्यक संचालक सुखदेव पवार, नगरविकास उपसचिव म. मो. पाटील, विवेककुमार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, शहर अभियंता अशोक अग्रवाल आदी उपस्थित होते.
श्री. खोतकर म्हणाले की, शहरात घनकचर्‍याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. शहराच्या एकत्रित घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत योजनेअंतर्गत घनकचर्‍याच्या समस्येबाबत प्रस्ताव तयार करुन केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे. जालना शहरातील पाणी पुरवठ्याच्या व्यवस्थापनेबाबत यावेळी आढावा घेण्यात आला. प्रलंबित योजनेमध्ये इंदीवाडी, सिद्धीविनायक, नागेवाडी या योजना पूर्ण करण्यासाठी लोकवर्गणी आणि शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देणार असल्याचेही श्री. खोतकर यांनी सांगितले. अमृत योजनेअंतर्गत भूमिगत गटारांच्या समस्या सोडविण्यासाठीही संबंधित अधिकार्‍यांना निर्देश यावेळी देण्यात आले. शहरातील रस्ते तसेच वाहतूक समस्यांबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.