Breaking News

मनुष्याला इतर ग्रहांचा आधार घ्यावा लागू शकतो - डॉ. सुरेश नाईक

पुणे, दि. 01 - प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग्ज यांनी काही दिवसांपूर्वी पृथ्वी शंभर वर्षे टिकेल, असे विधान केले आहे. त्यामध्ये कल्पनाविलास किंवा रंजकता नसून  त्यामागे अभ्यासपूर्ण संशोधन आहे. पुढील शंभर वर्षांत मनुष्याला इतर ग्रहांचा आधार घ्यावा लागू शकतो. पृथ्वीनंतर मंगळ ग्रह मनुष्यासाठी सर्वांत सुरक्षित जागा आहे.  तेथील तापमान, वातावरण पृथ्वीशी मिळतेजुळते आहे. त्यामुळेच भविष्यात मंगळाकडे पर्यायी जग म्हणून पाहिले जाईल, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नाईक यांनी  व्यक्त केले.
पुणे मराठी ग्रंथालयातर्फे डॉ. श्रीकांत कार्लेकर यांच्या ‘पृथ्वीजिज्ञासा’ पुस्तकास स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराने, अरुण करमकर यांच्या ‘पोलादी राष्ट्रपुरुष’ या  पुस्तकाला चेतना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी डॉ. नाईक बोलत होते. धनंजय बर्वे, अरुण करमरकर, श्रीकांत कार्लेकर, दिलीप ठकार, डॉ. अनुजा  कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. नाईक म्हणाले, चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा उपग्रह आहे. परंतु, तेथील तापमान आणि वातावरण मनुष्याच्या दृष्टीने घातक आहे. त्यानंतर सर्वांत जवळ शुक्र  आहे. तेथील तापमानही पृथ्वीपेक्षा जास्त आहे. पृथ्वीवरील पंधरा दिवस मिळून चंद्रावर एक दिवस होतो. पृथ्वीचे 260 दिवस मिळून शुक्रावर एक दिवस होतो.  मंगळावर मात्र पृथ्वीसारखाच 24 तासांचा एक दिवस असतो. फरक एवढच की मंगळावरचे एक वर्ष पृथ्वीवरील दोन वर्षांइतके असते. त्यामुळे आपल्या सर्वांचे  वाढदिवस दोन वर्षांनी येतील, असे डॉ. नाईक यांनी सांगीतले.  करमरकर, कार्लेकर यांनी पुस्तक लिहिण्यामागील भूमिका विशद केली. सरदार पटेल यांच्याकडे  भारतीय राजकारणाने अनेक वर्षे दुर्लक्ष केले. त्यांचे उत्तुंग कार्य समोर यावे, या हेतूने पुस्तक लिहिल्याचे करमरकर म्हणाले. पृथ्वीला मनुष्याने समजून घेण्याची गरज  असल्याचे कार्लेकर यांनी नमूद केले. चारूदत्त निमकर यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.