Breaking News

टाटा समूह तोट्यातील एअर इंडियाला विकत घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली, दि. 22 - एअर इंडियाला लवकरच अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. कारण टाटा समूह एअर इंडियाला विकत घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती  आहे. सरकारचा पांढरा हत्ती म्हणून ओळखल्या जाणार्‍या एअर इंडियावर सुमारे 50 हजार कोटींचं कर्ज आहे. तर 4 हजार कोटी व्याजाचा बोजादेखील आहे. त्यामुळे  गेल्या 10 वर्षांपासून तोट्यात असलेल्या एअर इंडियाचं खाजगीकरण झाल्यास कंपनीला अच्छे दिन येऊ शकतात. 1953 सालापर्यंत एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण  होण्याआधी ही कंपनी टाटा समूहाच्याच मालकीची होती. मात्र आता तिचं खासगीकरण झाल्यास टाटा समूहाचे 51 टक्के शेअर्स असण्याची शक्यता वर्तवली जात  आहे.
दरम्यान तत्कालीन सरकारने एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सचं विलीनीकरण केलं, त्यामुळे एअर इंडियाची ही अवस्था झाली, असं बोललं जातं. काही  दिवसांपूर्वीच सीबीआयने एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्स विलीनीकरण प्रकरणी चौकशीसाठी एफआयआर दाखल केला होता. या विलीनीकरणामुळे सरकारला  हजारो कोटींचा तोटा झाला, असं सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटलं आहे. सीबीआयने तीन एफआयआर दाखल केले होते. ज्यामध्ये 111 विमानांची खरेदी,  विमान लीजवर देणं आणि एअर इंडियाने फायदा होणारे हवाई मार्ग सोडल्याप्रकरणी चौकशीचा समावेश आहे.
नागरी हवाई मंत्रालय आणि एअर इंडियातील अज्ञात अधिकार्‍यांविरोधात गुन्हेगारी कट रचणं आणि भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. यूपीए सरकारच्या  कार्यकाळात मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयांसंबधी हे प्रकरण आहे, ज्यामुळे सरकारला हजारो कोटी रुपयांचा तोटा झाला, अशी माहिती सीबीआयचे प्रवक्ते आर. के.  गौड यांनी दिली.