Breaking News

कचरा रँपला विरोधासाठी नागरिकांचा महापौरांना घेराव

अहमदनगर, दि. 01 - अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरात असलेला महापालिकेचा कचरा रँपची जागा बदलून हा रँप नालेगाव परिसरातील वारूळाचा मारूती  येथे करण्याचे नियोजन मनपाने केले आहे.मात्र या संभाव्य कचरा रँपला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला असून पाहाणीसाठी आलेल्या महापौर सुरेखा कदम  यांच्या सहीत अधिका-यांना नागरिकांनी घेराव घातला.त्यामुळे मनपाचा हा नियोजित कचरा रँप सरू होण्यापूर्वीच वादाच्या भोवर्यात सापडला आहे.
मळीवाडा परिसरात जुन्या महापालिका कार्यालयाजवळ सध्या मनपाचा हा कचरा रँप आहे.घंटा गाड्यांच्या माध्यमातून शहरात गोळा केलला कचरा या ठिकाणी आणून  मोठ्या आकाराच्या कचरा वाहनांमध्ये टाकला जातो.त्यामुळे परिसरात सातत्याने मोठी दुर्गंधी असते.या कचरा रँपच्याजवळ 4 शाळा असल्याने लहान मुलांच्या  आरोग्याच्या दृष्टीने हा कचरा रँप तेथून हलविण्याची मागणी मनपातील विरोधी पक्षनेता बाळासाहेब बोराटे यांनी केली आहे.या पार्श्‍वभूमीवर मनपा प्रशासनाने  माळीवाड्यातील कचरा रँप हलविण्याचा निर्णय घेतला आहे.नवीन रँपसाठी वारूळाचा मारूती परिसरात जागेचे निरीक्षण करण्यासाठी बुधवारी सायंकाळी महापौर  सुरेखा कदम,उपायुक्त भालचंद्र बेहेरे,शिवेनेचे मनपातील गटनेते संजय शेंडगे,माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासहीत अधिकारी उपस्थित होते.मात्र परिसरातील  नागरिकांचा या नियोजित कचरा रँपला तीव्र विरोध आहे.त्यामुळे माजी नगरसेवक अरविंद शिंदे,शरद ठाणगे,सुनील कदम,सुनील ठाणगे यांच्यासहीत नागरिकांनी  महापौरांसहीत पाहाणीसाठी आलेल्या अधिका-यांना घेराव घातला.माळीवाड्यातील कचरा रँप हलविणे गरजेचे असले तरी हा कचरा रँप वारूळाचा मारूती परिसरात  तयार करू नये.या परिसरात गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती निर्माण होत असल्याने कचरा व दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा  लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे कचरा रँप येथे आणू नये अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली.नागरिकांकडून होणारा तीव्र विरोध लक्षात घेता महापौर सुरेखा  कदम यांनी कचरा संकलनासाठी पर्यायी जागा शोधण्याचा आदेश यावेळी प्रशासनाला दिला.तसेच नवीन जागा शोधतांना कमी नागरी वसाहती असतील अशा  परिसरात कचरा रँपसाठी जागा निश्‍चित करण्याचे देखील महापौरांनी यावेळी निर्देश दिले आहेत.