Breaking News

पशुधन हीच शेतक-याची खरी संपत्ती : आ. थोरात

अहमदनगर, दि. 03 - संगमनेर तालुक्यात दुध संघातून मोठी स्थिरता मिळाली आहे. जनावरांचे आरोग्य हे शेतक-यांसाठी महत्वाचे असून पशुधन हीच शेतक-यांची  खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. यशोधन येथे राजहंस मेडीकल स्टोअर्स उद्घाटन प्रसंगी आयोजित  कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी समवेत बाजीराव पा. खेमनर, संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख आदी उपस्थित होते.
आमदार थोरात म्हणाले की, दुग्ध व्यवसायाने शेतकर्यांच्या जीवनात मोठी समृद्धी आणली आहे.आता हा प्रमुख व्यवसाय झाला आहे.काळाबरोबर या व्यवसायातही  तंत्राचा वापर केला पाहिजे. राजहंस दुध संघाने गुणवत्तेने आपला लौकिक सदैव वाढविला आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी शेतक-यांच्या हितासाठी या  व्यवसायाला तालुक्यात चालना दिली. आज संगमनेर तालुका दुष्काळी असूनही दुग्ध व्यवसायात रायात अग्रेसर आहे.पशुधन हे महत्वाचे असून त्याची काळजी  मुलांप्रमाणे घ्यावी लागते. त्यांचे आरोग्य जपण्यासाठी दूध संघाने सतत आरोग्य शिबीरे व विविध उपक्रम राबविले आहे.निरोगी व सदृढ पशुधना साठी दुध संघाने  औषधांचा स्वतंत्र विभाग सुरु केला आहे.याचा शेतकर्यांना नक्कीच फायदा होणार आहे,असे ते म्हणाले.रणजितसिंह देशमुख,बाजीराव पा.खेमनर यांची भाषणे  झाली.कार्यकारी संचालक डॉ. प्रतापराव उबाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.नामदेव कहांडळ यांनी सुत्रसंचालन केले.साहेबराव गडाख यांनी आभार मानले.