Breaking News

सर्व आघाड्यांवर मोदी सरकार नापास - सोनिया गांधी

नवी दिल्ली, दि. 07 - विकासापासून ते सुरक्षेपर्यंतच्या सर्व आघाड्यांवर मोदी सरकार नापास झाल्याची टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली. काँग्रेस कार्यसमितीची बैठक आज संपन्न झाली. त्यात त्या बोलत होत्या. या बैठकील उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह कचे अनेक नेते बैठकीला उपस्थित होते. 
गेल्या तीन वर्षात काश्मीर, सुरक्षा आणि विकासाच्या मुद्यावर मोदी सरकार अपयशी ठरले आहे .  काँग्रेसच्या कार्यकाळात काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणि शांतता होती. मात्र, आता काश्मीरमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. काश्मीर खोर्‍यातील हिंसक घटनांमध्ये वाढ झाली आहे, असे त्या म्हणाल्या. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी निश्‍चलनीकरणाबद्दल व्यक्त केलेली मते आणि भाकिते खरी ठरत आहेत. देशातील गरीब, पीडित आणि अल्पसंख्यांकांची परिस्थिती दयनीय आहे, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा झगमगाट मोठा आहे. मात्र, कामगिरीच्या नावावर त्यांना शून्य गुणही देता येणार नाहीत. केंद्र सरकार सबका साथ, सबका विकासाच्या घोषणा देत आहे, मात्र, देशातील महिला सुरक्षित नाहीत. प्रसारमाध्यमांना भीती घातली जात आहे. देशातील जनता दबावाखाली जगत आहे, अशी बोचरी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केली. भारतीय अंतराळ आणि संशोधन संस्थेने केलेल्या कामगिरी कौतुकास्पद असल्याचे सांगत आझाद यांनी ’इस्रो’चे अभिनंदन केले.
या बैठकीला अहमद पटेल, अशोक गहलोत, अविनाश पांडे, आशा कुमारी, एके एंटनी, कमलनाथ आणि सी.पी. जोशी आदी नेते उपस्थित होते. सध्याची राजकीय परिस्थिती, गोहत्या, उत्तर प्रदेशात उसळलेली जातीय हिंसा, केंद्र सरकारची कार्यशैली, अर्थव्यवस्था आणि काश्मीर यांसारख्या अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली.