Breaking News

तंबाखू उत्पादन व सेवनात भारत जगात दुस-या क्रमांकावर

नवी दिल्ली, दि. 01 - दशकापूर्वीच्या तुलनेत 2015-16 मध्ये देशातील तंबाखूचे सेवन कमी झाले असले तरी भारत तंबाखू उत्पादन व सेवनात जगात दुस-या  क्रमांकावर आहे, असे राष्ट्रीय आरोग्य संदर्भातील अहवालात म्हटले आहे. त्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. या यादीत चीनचा पहिला क्रमांक लागतो.
देशात तंबाखूचा सर्वाधिक वापर मिझोराम, मेघालय, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा व आसाम या राज्यांत आहे. येथील सरासरी 70.7 टक्के लोक कुठल्या ना कुठल्या  माध्यमातून तंबाखूचे सेवन करतात, असे 2015-16 च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून समोर येते. हा आकडा देशाच्या सरासरी 26 टक्के अधिक आहे.
ईशान्य भारताच्या यादीत मिझोराममध्ये 15 ते 49 वर्षे वयोगटातील 80.4 टक्के पुरुष व 59.2 टक्के महिला तंबाखूचे सेवन करतात. त्या खालोखाल मेघालय (72.2  टक्के), मणिपूर (70.6 टक्के), नागालँड (69.4 टक्के), त्रिपुरा (67.8 टक्के) व आसाम (63.9 टक्के) पुरुष तंबाखूचे सेवन करतात. या राज्यांत महिलांचे सरासरी  प्रमाण 37.7 टक्के इतके आहे. जे राष्ट्रीय आकडेवारीच्या तुलनेत 6.8 टक्के आहे.
ईशान्येकडील राज्यांत एक हजारापैकी 112 पुरुष व 60 महिलांचा कर्करोगाने मृत्यू झाला आहे. त्या तुलनेत देशात सरासरी 47 पुरुष व 44 महिलांचा मृत्यू झाल्याचे  2012 मधील एका सर्वेक्षणातून समोर येते. तंबाखूच्या सेवनाने अनेक आजार उद्भवू शकतात. त्यात कर्करोग, फुफ्फुस व ह्दय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार  होऊ शकतात. हे केवळ ईशान्य भारतातच नव्हे तर अन्य भागातही लाखो भारतीयांना आजार आहेत. तंबाखू सेवन करणा-या 29.3 टक्के महिला व 30.6 टक्के  पुरुषांनी गेल्या वर्षभरात सवय सोडण्यासाठी प्रयत्न केले.