Breaking News

निर्मल शोषखड्डे हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा - पंकजा मुंडे

मुंबई, दि. 30 - ग्रामीण भागातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामविकास आणि मनरेगा विभागाच्या सहभागातून निर्मल शोषखड्डे ही योजना राबविण्यात  येत आहे. घरातील सांडपाणी या शोषखड्ड्यांमध्ये जिरविल्यामुळे सांडपाण्याचे व्यवस्थापन होण्याबरोबरच गावे डासमुक्त होत आहेत. निर्मल शोषखड्डे हा उपक्रम  राज्यात प्रभावीपणे राबवावा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्या.
ग्रामविकासच्या केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी येथील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय दक्षता  व सनियंत्रण समितीची बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार चिंतामण वणगा, आमदार लक्ष्मण पवार,  आकाश फुंडकर, राजन साळवी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव विवेक नाईक, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियांनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला  यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी निर्मल शोषखड्ड्यांची योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. मनरेगा अंतर्गत ग्रामीण  भागात असे शोषखड्डे बांधण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. आता ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना,  आदीम जाती आवास योजना, पारधी विकास योजना यांमधून बांधण्यात येणार्‍या घरकुलांमध्येही असे निर्मल शोषखड्डे बांधण्यात यावेत. यासाठी ग्रामविकास आणि  रोहयो विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.