Breaking News

बाबरी उद्ध्वस्त करण्यामागे कोणताही कट नव्हता- उमा भारती

लखनौ, दि. 31 - बाबरी मशीद पाडण्यामागे कोणताही गुन्हेगारी कट रचला नव्हता, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी दिली. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह 12 आरोपींवर गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी खटला चालवण्याचे निर्देश दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्या बोलत होत्या. 
बाबरी मशीद पाडली, त्यादिवशी मी तेथे उपस्थित होते, हे जगजाहीर आहे. कोट्यवधी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, लाखो अधिकारी आणि हजारो राजकीय नेतेही त्यावेळी उपस्थित होते. ज्याप्रमाणे आणीबाणीच्या काळात खुली आंदोलने करण्यात आली, त्याचप्रमाणे हे खुले आंदोलन होते. यामध्ये कोणताही कट रचला गेला असे मला वाटत नाही, असे त्यांनी सांगितले. आता फक्त त्या विधात्यावर आशा आहेत, असे त्या म्हणाल्या. या आंदोलनात मी प्रामाणिकपणे सहभागी झाले होते आणि त्याबाबत मी अपराधी असल्याचे मला वाटत नाही, असे त्यांनी नमूद केले.