Breaking News

पदभार न स्वीकारणार्‍या अधिकार्‍यांवर होणार कारवाई

पालघर, दि. 05 - पालघर जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी महत्वपूर्ण असणार्या रोहयो अंतर्गत रोजगार निर्मितीसाठी नेमलेल्या उपजिल्हाधिकार्‍यांची  नियुक्ती होऊनही त्यांनी आपला पदभार न संभाळल्याने त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांनी निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा आदी भागात रोजगार उपलब्ध होत नसल्याने मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असे. त्याचा विपरीत परिणाम  कुपोषण, शिक्षण व आरोग्यावर होत असल्याने हे स्थलांतर रोखण्यासाठी गावागावात रोजगाराची निर्मिती करण्याचे आदेश शासन स्तरावरून देण्यात आले होते.  मात्र कमी मजूरी ती ही वेळेवर दिली जात नाही. बोगस मजूर दाखवून पैसे लाटणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत होता. ते रोखण्यासाठी पालघर जिल्ह्यात  रोजगार हमी योजना विभागासाठी उपजिल्हाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र आदेश देऊनही पदभार स्वीकारण्यास ते तयार होत नसल्याने  त्याचा मोठा परिणाम जिल्ह्यातील रोहयो अंतर्गत कामावर पडला होता. विवेक पंडितांनी ह्या बाबत प्रधान सचिवांच्या लक्ष वेधल्यानंतर नियुक्ती होऊनही हजर न  राहणार्या अधिकार्‍यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश परदेशी ह्यांनी दिले.