Breaking News

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 132 व्या तुकडीचा दीक्षांत समारोह

पुणे, दि. 30 - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून तीन वर्षाच्या खडतर प्रशिक्षणानंतर सैन्यामध्ये दाखल होणार्‍या सैनिकी अधिकार्‍यांनी राष्ट्र निर्माणासाठी आणि सुरक्षेसाठी  आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी येथे केले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या 132 व्या तुकडीचा दीक्षांत समारोह आज खडकवासला येथील प्रबोधिनीच्या हबीबुल्लाह हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात  संपन्न झाला. या दीक्षांत समारोहाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल चे.विद्यासागर राव हे होते. यावेळी प्रबोधिनीचे कमांडंट एअर मार्शल जसजितसिंग क्लेअर, डेप्युटी  कमांडंट रिअर डमीरल एस.के.ग्रेवाल, प्राचार्य डॉ.ओ.पी.शुक्ला,उपप्राचार्य डॉ.एन.डी.दीप, प्रबोधिनीच्या विविध विद्या शाखांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्यपाल चे.विद्यासागर राव म्हणाले, प्रबोधिनीमध्ये देण्यात आलेल्या प्रशिक्षणामुळे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सैनिकी अधिकारी  सक्षम आहेत. प्रबोधिनीत देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा वापर, त्यांनी प्रत्यक्ष कृतीमध्ये करावा. त्यामुळे त्यांना सर्व क्षेत्रामध्ये यश आणि विजय निश्‍चितच मिळेल.  देशांतर्गत सुरक्षा आणि दहशतवादी कारवायांमध्ये वाढ यामुळे कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी सैनिकी अधिकार्‍यांनी ठेवावी, त्यासाठी सर्वांनी नेहमी  तयारीत रहायला हवे. सैन्य दलांचा शौर्याचा देदिप्यमान वारसा पुढे न्यावा, निरंतर प्रशिक्षणाचा मंत्र अंगिकारावा असे आवाहन त्यांनी प्रबोधिनीतून बाहेर पडणार्‍या  सैनिकी अधिकार्‍यांना केले. कडक शिस्त आणि देशसेवेप्रती सशस्त्र दलाच्या असलेल्या बांधिलकीमुळे सैनिकी अधिकार्‍यांकडे समाज विश्‍वासाने बघतो. हा विश्‍वास  टिकविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी सर्वांना केले.
कमांडंट एअर मार्शल जगजितसिंग क्लेर यांनी प्रास्ताविकात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचा समारोप डेप्युटी कमांडंट रिअर डमीरल  एस.के.ग्रेवाल यांनी केला. दिक्षांत सोहळयास सैनिकी अधिकारी, पालक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.