Breaking News

तीन तलाक पीडित महिलांसाठी योगी सरकारचा निर्णय

लखनऊ, दि. 23 - तीन तलाक पद्धतीवर आपली रोखठोक भूमिका मांडणार्‍या महिलेला धर्माच्या ठेकेदारांनी माफीनामा सादर करण्यास भाग पाडत आहेत. तर दुसरीकडे तीन तलाक पीडित महिलांना मोठा दिलासा देणारा निर्णय यूपीच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे. तीन तलाक पीडित महिलेसाठी यूपी सरकार आता आश्रम उभारणार आहे.
योगी सरकारनं घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार, यूपी सरकार विधवा महिलांप्रमाणेच तीन तलाख पीडित महिलांसाठी आश्रम उभारणार आहे. या आश्रमात पीडित मुस्लीम महिलांसाठी राहण्याची, जेवण्याची आणि त्याच्या सोबत असलेल्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. सोबतच शिवणक्लास, कॉम्प्युटर आणि स्वयं रोजगार सारख्या सुविधाही या आश्रमात देण्यात येतील. यामुळे महिलांना पुन्हा स्वतःच्या पायावर खंबीर उभं राहता येणार आहे. संपूर्ण राज्यात अशी आश्रमं उभी करण्यासाठी योगी सरकार वक्फच्या जमीनींची पाहणी करणार आहे.
यूपी विधानसभा निवडणुकीत भाजपनं तीन तलाक पद्धतीवर आपली भूमिका जनतेसमोर ठेवली होती. त्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रं हाती घेताच, त्यांच्या हेतूवर आणि भूमिकेवर अनेकांनी प्रश्‍न उपस्थित केले. मात्र योगींच्या तीन तलाक पीडित महिलांसाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानं संशय घेणार्‍यांना चांगलीच चपराक मिळाली.