Breaking News

अनिल कवडे यांचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून मुख्यमंत्र्याच्या हस्ते गौरव

अहमदनगर, दि. 23 - सन 2015-16  या वर्षात राबविलेल्या पथदर्शी योजना, प्रकल्पाची घेतली दखल  दिनांक 21: नागरी सेवा दिनानिमित्त शुक्रवारी संध्याकाळी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या कार्यक्रमात अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी प्रशासनात विविध आघाड्यांवर केलेल्या उत्कृष्ट  कामाबद्धल त्यांचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी वित्तमंत्री सुधीर मूनगंटीवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सुमित मल्लिक आदींची उपस्थिती होती.
सन 2015-16  या वर्षात राबविलेल्या पथदर्शी योजना आणि विविध घटकांसाठी कार्यान्वित केलेले विशेष प्रकल्पांची दखल घेत जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना राज्य सरकारचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार घोषीत झाला आहे.
 जलयुक्त अभियानात श्री कवडे यांना नुकताच शासनाचा राज्यस्तरावर तिसरा व नाशिक विभागात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार घोषीत झाला.  त्या पाठोपाठ उत्कृष्ट  जिल्हाधिकारी पुरस्कार मिळाला. विविध योजनांची उत्कृष्टतेने व गतीमानतेने अंमलबजावणी करतानाच आपल्या प्रभावी वक्तृत्वाने कवडे  यांनी प्रत्येक योजनेत लोकसहभाग जलयुक्त शिवार, स्वच्छ भारत, स्त्री  भ्रृण हत्यासारख्या विषयावर  प्रभावी प्रबोधन करतानाच  दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पशुधनास लाभदायी  ठरलेला मुरघास  प्रकल्प, कारागृहाच्या सुरक्षिततेसाठी  नगर व विसापूर कारागृहास सीसीटीव्ही कॅमेरे, अंगणवाडीत बालकांच्या सुदृढीकरणासाठी  वजन यंत्रे, वॉटरमिटरींग, दारु पिऊन वाहन चालविण्यामुळे  होणारे अपघात टाळण्यासाठी  पोलिस दलास ब्रेथ अ‍ॅनॉलायझर आदी विशेष प्रकल्प जिल्हाधिकारी  अनिल कवडे यांच्या संकल्पनेतून जिल्हयात राबविण्यात आले.