Breaking News

बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही - ना.फुंडकर

जिल्ह्याचे 7 लक्ष 47 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे नियोजन ; शेतकर्‍यांनी पिक विमा योजनेत सहभागी व्हावे

बुलडाणा, दि. 15 - जिल्ह्यात गत खरीपात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकर्‍यांना उत्पादन चांगले मिळाले. यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत असल्यामुळे खरीप हंगामात शेतकरी मोठ्या संख्येने पेरणी करणार आहे. शेतकर्‍याला कुठल्याही प्रकारे बियाणे व खतांची कमतरता पडणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे. बियाणे व खतांचे राज्यस्तरावरच प्रभावी नियोजन असल्यामुळे शेतकर्‍यांना खते व बियाण्यांची कमतरता भासणार नाही, असा विश्‍वास राज्याचे कृषि तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज व्यक्त केला. 
जिल्ह्याच्या खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे आयोजन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री बोलत होते. बैठकीला व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दिपा मुधोळ, विभागीय सहसंचालक शु. रा सरदार, पीडीकेव्हीचे विस्तार संचालक डॉ. प्रदीप इंगोले आदी उपस्थित होते. तर सभास्थळी आमदार सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, संजय रायमूलकर, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती श्‍वेता महाले आदी उपस्थित होते.
कृषि योजनांची माहिती गावपातळीवर पोहोचण्यासाठी दोन गाव मिळून कृषि मित्रांची निवड करण्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, कृषि मित्रांची निवड लवकर करावी. त्यांनी नेमून दिलेल्या गावात कृषि योजनांची माहिती शेतकर्‍यांना द्यावी. त्याचप्रमाणे आत्माअंतर्गत शेतकरी समित्यांची स्थापना त्वरित करण्यात यावी. बोगस बियाणे, खत व किटकनाशकांच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची तक्रार आल्यास त्याचा त्वरित निपटारा करून संबंधीत शेतकर्‍याला नुकसान भरपाई द्यावी. तक्रार करण्यासंदर्भात शेतकर्‍यांना निर्माण केलेल्या व्यवस्थांची माहिती द्यावी.
ते पुढे म्हणाले, शासनाने प्रधानमंत्री कृषि पिक विमा अंमलात आणली आहे. या योजनेत सर्वच पिकांना विम्याचे संरक्षण देण्यात येणार आहे. पावसाचा खंड पडल्यामुळे नुकसान झाले असल्यास त्याचाही लाभ या योजनेतून देण्यात येणार आहे. तसेच  पीक कर्ज न घेतलेल्या, किडी पडलेल्या व पेरल्यानंतर पाऊस न आल्यामुळे करपलेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्यात येईल. शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेत सहभागी होऊन येणार्‍या खरीप हंगामात पीक नुकसानीपासून आर्थिक संरक्षण प्राप्त करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
महातिवरणने त्यांच्याकडील मान्सूनपुर्व वीज यंत्रणेची कामे 15 दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना देत पालकमंत्री म्हणाले, पेड पेडींग वीज जोडण्या गतीने पूर्ण करण्यात याव्यात. रोहीत्र जळालेले असल्यास त्वरित रोहीत्र बदलून देण्यात यावे.  जेणेकरून शेतकर्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. मृद आरोग्य पत्रिका काढण्यासाठी शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी जिल्ह्यात 2017-18 मध्ये 7 लाख 47 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे उद्दिष्ट असल्याची माहिती देवून बैठकीचे प्रास्ताविक केले. येणार्‍या खरीप हंगामाकरीता जिल्ह्यात पेरणीसाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रावर सर्व पिकांच्या 1 लक्ष 36 हजार 539 क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महाबीज, राष्ट्रीय बियाणे निगम यांच्याकडील 38 हजार 580 आणि खाजगी बियाणे कंपन्यांकडून 97 हजार 959 क्विंटलचा बियाण्याचा समावेश आहे. बैठकीच्या सुरूवातीला कृषि विज्ञान केंद्राचे डॉ. सी.पी जायभाये यांनी पुढील वर्षात होणार्‍या मान्सून पावसाचा अंदाज मांडला. बैठकीत लोकप्रतिनिधींनी विविध प्रश्‍न मांडले. बैठकीला विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.