Breaking News

मराठवाड्यानंतर विदर्भातही अवकाळी, शेतकर्‍यांची चिंता वाढली

अकोला/वाशिम, दि. 17 - मराठवाड्यानंतर अवकाळी पावसाने विदर्भालाही झोडपलं आहे. अकोला आणि वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. वाशिममध्ये मंगरुळपीर, कारंजा, मानोरा तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला. मराठवाड्यात काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांवर असमानी संकट कोसळलं आहे. लातूरसह बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना या गारपीटीचा आणि पावसाचा मोठा फटका बसला.
मराठवाड्यानंतर आता विदर्भातही शेतकर्‍यांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. पावसाने बळीराजाची चिंता आणखीच वाढवली आहे. कारण विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच गडचिरोली जिल्ह्यातही अवकाळी पावसाने मोठं नुकसान झालं होतं.
अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं नुकसान झालेल्या शेतीचे 24 तासाच्या आत पंचनामे करण्याचे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिलेत. राज्यभरात काल झालेल्या अवकाळी पावसानंतर आज सकाळी 7 वाजता सदाभाऊ खोत शेतकर्‍याच्या बांधावर पोहोचले. पंढरपूर तालुक्यातील सरकवली, ओझेवाडी या गावांची सदाभाऊंनी पाहणी केली. अवकाळी पावसात जीव गमावलेल्या शेतकर्‍याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसंच घरांची पडझड झाल्यास त्याचीही नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
काल सोलापूर जिल्ह्यासह लातूर, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड परिसराला अवकाळीने झोडपलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने आदेश दिल्यानंतर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत पहाटेच पंढरपुरात दाखल झाले. सदाभाऊ यांच्यासोबत कृषी, महसूलसह इतर विभागांच्या अधिकार्‍यांची फौज शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचली.