Breaking News

शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसह स्वामीनाथन आयोग लागु करा खा.प्रतापराव जाधव यांची लोकसभेत आग्रही मागणी

बुलडाणा, दि. 23 - पेरलं तर उगवत नाही आणि उगवल तर योग्य भावात विकल्या जात नाही. अशा दुहेरी परिस्थितीत निसर्गाच्या अस्मानीसह शासनाच्या शेतकरी विरोधी आयात धोरणातील त्रुटींचा सुलतानीमार सहन करत शेतकरी आर्थीक विवंचना सहन करत आहेत. उत्तरप्रदेशमध्ये सत्तेत येण्याआधी भाजपने शेतकर्‍यांच्या कर्जमुकतीचे आश्‍वासन दिले. त्यातुलनेत महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या जास्त आहेत. दुर्दैवाने आत्महत्याग्रस्त प्रदेश अशा नाचक्कीच्या बिरुदावल्या राज्यातील अनेक जिल्ह्यांसमोर चिटकत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना कर्जमुक्तीचा लाभ द्यावा, शिवाय स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अशी आग्रही मागणी बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी लोकसभेत केली आहे.
दिल्ली येथे सुरु असलेल्या संसदेच्या अधिवेशनात लोकसभेमध्ये नियम 377 अन्वये शेतकर्‍यांच्या जीवन-मरणाशी संबंधीत विषयावर खा. प्रतापराव जाधव यांनी आज 22 मार्च रोजी अभ्यासपुर्ण भाषण केले. शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी शिवसेना राज्यातच नव्हे तर केंद्रातसुध्दा आक्रमक आहे. रस्त्यावर सुध्दा लढा तिव्र करण्यात आला असुन खा. जाधव यांनी लोकसभेमध्ये देशातील खासकरुन महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या समस्यांचा पाढा वाचला. यावेळी खा. जाधव पुढे म्हणाले की, शेतकर्‍यांची परिस्थिती खुप खराब आहे. दुष्काळाचा सामना  केल्यावर आता गारपिटीने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या जात आहे. किमान सुधारित आधाराुत किंमतीनूसार  शेती उत्पादन खरेदी करण्याचा दावा केल्या जातो. मात्र, बारदाना आणि गोडावुन व्यवस्थेच्या नावाखाली शेतकर्‍यांना वेठिस धरल्या जात आहे. तूर उत्पादक शेतकर्‍यांच्या बाबतीमध्ये सध्या दैना आहे.  पेरतांना 10 ते 12 हजार रुपये प्रति क्विंटल भाव असल्याने शेतकर्‍यांनी मोठ्याप्रमाणावर तूर लागवड केली. मात्र, आता तिच तूर विकतांना भाव साडेतीन ते चार हजारावर खाली आले. केंद्रशासनाद्वारे खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. 15 ते 20 दिवस शेतकरी माल घेवुन रांगेत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील 7 पैकी 5 केंद्र बंदच आहेत. त्यामुळे तूर खरेदीकेंद्र वाढवावेत. तसेच शेतकर्‍यांना कर्जमुक्त करुन स्वामिनाथन आयोगाच्या लागवडखर्च अधिक 50 टक्के नफा या तत्वावर योजना आखाव्यात, अशी आग्रही मागणी खा. प्रतापराव जाधव यांनी लोकसभेमध्ये केली.