Breaking News

पोलीस, आयकर विभागात 1.80 लाख कर्मचार्‍यांची भरती

नवी दिल्ली, दि. 02 - केंद्र सरकार कर्मचार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार 2 लाख 80 हजार कर्मचारी भरती केले जाणार आहेत. यापैकी 1 लाख 80 हजार कर्मचारी पोलीस आणि आयकर विभागात भरती केले जातील.
मार्च 2016 पर्यंतच्या आकडेवारीनुसार केंद्राकडील विविध 55 खात्यांमध्ये आणि मंत्रालयामध्ये 32 लाख 84 हजार कर्मचारी आहेत. यामध्ये रेल्वेच्या 13 लाख 31 हजार कर्मचार्‍यांचा समावेश आहे. लष्करातील मनुष्यबळाचा यामध्ये समावेश नाही. त्यामुळे प्रस्तावित भरती केल्यास एकूण कर्मचार्‍यांची संख्या मार्च 2018 पर्यंत 35 लाख 67 हजार एवढी होईल.
अंमलबजावणी संस्था मजबूत करण्यावर अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. दिल्ली पोलीस आणि पॅरामिलिटरीचं मनुष्यबळ 10 कोटी 7 लाखांवरुन मार्च 2018 पर्यंत 11 लाख 13 हजार एवढं करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. नोटाबंदीनंतर काळ्या पैशाविरोधात सुरु केलेल्या मोहिमेसाठी आयकर खात्यातही मेगाभरती केली जाणार आहे. आयकर खात्याचं मनुष्यबळ सध्या 46 हजार एवढं आहे, तर ते मार्च 2018 पर्यंत 80 हजार केलं जाईल. तर सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाला मार्च 2018 पर्यंत अतिरिक्त 41 हजार एवढे कर्मचारी दिले जातील.