Breaking News

लातूर जिल्ह्यातील 10 पैकी 7 पंचायत समित्यांवर भाजपाचा झेंडा

लातूर (प्रतिनिधी), दि. 16 -  लातूर जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडी मंगळवारी झाल्या. 10 पैकी 7 पंचायत समितीत भारतीय जनता पक्षाचे सभापती व उपसभापती झाले आहेत. तर 3 पंचायत समितीत काँग्रेसचा सभापती झाला आहे. औशात काँग्रेसला मनसेने साथ दिली आहे. त्यामुळे काँग्रेसचा सभापती तर मनसेचा उपसभापती झाला आहे. लातूर पंचायत समितीत राष्ट्रवादीच्या मदतीने काँग्रेसने सभापती व उपसभापतीपद मिळविले आहे. 
नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने भरघोस यश संपादन केले. 7 पंचायत समितीत निर्विवादपणे वर्चस्व मिळविले आहे. त्यामुळे चाकूर, अहमदपूर, रेणापूर, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, उदगीर पंचायत समित्यांत भाजपाचे सभापती व उपसभापती झाले आहेत. तर लातूर, औसा व जळकोट पंचायत समितीत काँग्रेसचे सभापती झाले असून, औशात काँग्रेसला बहुमतासाठी एका सदस्याची आवश्यकता होती. मनसेच्या इंजिनने हाताला साथ दिल्यामुळे काँग्रेसचा सभापती तर मनसेला उपसभापती पद देण्यात आले आहे.
भाजपाचे सभापती व उपसभापती...निलंगा पंचायत समितीच्या सभापतीपदी अजित माने, उपसभापती ज्ञानेश्‍वर वाकडे,शिरूर अनंतपाळ पं.स.च्या सभापतीपदी वर्षा भिक्का, उपसभापती डॉ. नरेश चलमले, चाकूर- सभापती सुनीता डावरे, उपसभापती वसंत डिगोळे, अहमदपूर- सभापती अयोध्याताई केंद्रे, उपसभापती मंगलाबाई खंदाडे, रेणापूर- सभापती अनिल भिसे, उपसभापती अनंत चव्हाण, देवणी- सभापती सत्यवान कांबळे, उपसभापती शंकर पाटील, उदगीर- सभापती सत्यकला गंभिरे, उपसभापती रामदास बेंबडे यांची निवड करण्यात आली. लातूर पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या शीतल फुटाणे, उपसभापतीपदी दत्ता शिंदे, जळकोट- सभापतीपदी व्यंकटराव केंद्रे, उपसभापती स्वाती केंद्रे. औसा पं.स. सभापतीपदी काँग्रेसचे संजय कदम, तर उपसभापतीपदी मनसेच्या रेखाताई नागराळे यांची निवड करण्यात आली आहे.
औसा व लातूर पंचायत समितीत बहुमतासाठी काँग्रेसला इतर पक्षांचा आधार घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करणे अवघड होते. लातूर पंचायत समितीत काँग्रेसचे 10, भाजपाचे 7 व राष्ट्रवादीचे 3 सदस्य आहेत. बहुमतासाठी 11 सदस्य आवश्यक होते. त्यात काँग्रेसला राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी पाठिंबा दिला. तर औसा पंचायत समितीत 18 पैकी 9 जागांवर काँग्रेसने विजय मिळविला होता. सभापतीपदासाठी एका सदस्याची आवश्यकता होती. त्यामुळे मनसेला उपसभापतीपद देऊन काँग्रेसने सभापतीपद मिळविले आहे.