Breaking News

तटकरे बंधूंमधील वाद मिटला, शरद पवारांच्या मध्यस्थीला यश

बारामती, दि. 17 - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीला यश आले आहे. तटकरे बंधूंमधील वाद अखेर मिटला आहे. बारामतीत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधानपरिषदेचे आमदार अनिल तटकरे या दोन्ही भावांशी चर्चा करुन वाद मिटवला. बारामतीतील बैठकीला शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेचे आमदार अनिल तटकरे, आमदार अवधूत तटकरे, अनिल तटकरेंचे धाकटे सुपुत्र संदीप तटकरे, सुनील तटकरेंचे सुपुत्र अनिकेत तटकरे, सुनील तटकरेंची कन्या आदिती तटकरे यांची उपस्थिती होती.
खरंतर त्यांच्या गावीच तटकरे बंधूंमधील वाद मिटला. फक्त आश्‍वस्त करण्यासाठी तटकरे कुटुंबीय भेटीला आले होते. एकत्रित कुटुंबामुळे निवडणुकीत परिणाम दिसतील, असे बैठकीनंतर शरद पवार यांनी सांगितले.
नगरपालिकेच्या निवडणुकीत अनिल तटकरे यांचे धाकटे पुत्र संदीप तटकरे शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून रोहा नगरपालिकेत उतरले. त्यावेळी राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि अनिल तटकरे यांचे थोरले पुत्र अवधूत तटकरे यांनी शिवसेनेकडून लढणार्‍या संदीप तटकरेंच्या प्रचाराला उपस्थिती लावली. त्यामुळे नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. संदीप तटकरेंचं शिवसेनेकडून लढणं, हा तटकरे कुटुंबीयांसाठी मोठा धक्का होता. मात्र, निवडणूक चुरशीची होऊन रोहा नगरपालिकेत काकांचीच म्हणजे सुनील तटकरेंचाच विजय झाला. मात्र, काका-पुतण्या आणि भाऊ-भाऊ हा वाद कायम राहिला होता. आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शरद पवारांनी तटकरे बंधूंमधील वाद गांभिर्याने घेत चर्चेतून मिटवला आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा तटकरे कुटुंब नव्या जोमाने उतरण्याची शक्यता आहे.