Breaking News

पिंपरी-चिंचवडची अखेर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड

पुणे, दि. 01 -  केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अखेर पिंपरी-चिंचवडची निवड झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ट्वीट करून ही  माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान व केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचे आभार मानले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले असले तरी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अधिकृत वेबसाइटवर पिंपरी-चिंचवडच्या नावाचा समावेश दिसत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत  आहेत.
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी निवड झालेल्या शहरांच्या यादीतून पिंपरी-चिंचवडला डावलण्यात आल्याने शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची  भावना होती. त्याचा महापालिका निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्यता होती. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपविरुद्ध रान उठवण्यास  सुरूवात केली होती.  या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घाईघाईत यासंदर्भातील घोषणा केल्याची चर्चा आहे.
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांचा संयुक्त प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यावेळी केंद्र शासनाने स्वतंत्र  प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. त्यानंतर दुसर्‍या यादीतही पिंपरी-चिंचवडचा समावेश झाला नव्हता. राज्यात व केंद्रात सत्ता असल्याने भाजप जाणीवपूर्वक  पिंपरी-चिंचवडला डावलत असल्याचा आरोप महापालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारामुळेच या  प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवडची निवड होत नसल्याचा प्रत्यारोप भाजपकडून करण्यात येत होता. त्यामुळे निवडणुकीत स्मार्ट सिटीचा विषय चागंलाच गाजण्याची  चिन्हे दिसत होती.
पुणे मेट्रोच्या भूमिपूजन सोहळ्यातील भाषणात व्यंकय्या नायडू यांनी पिंपरी-चिंचवडचाही स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश होऊ शकतो, असे संकेत दिले होते.  मुख्यमंत्री फडणवीस यानी नायडू यांच्याकडून या बाबतच्या निर्णयाची घोषणा होण्याची वाट न पाहता घाईघाईत ट्वीट करून निर्णयाचे राजकीय श्रेय भाजपला  मिळवून देण्याची चलाखी केली आहे.