Breaking News

राष्ट्रध्वजाचा उचित वापर करावा

पुणे, दि. 25 - दरवर्षी 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 1 मे, इतर राष्ट्रीय कार्यक्रम, महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम व क्रिडा सामन्यांच्यावेळी विद्यार्थी व नागरीकांकडून  कागदाच्या व प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजांचा वापर करण्यात येतो. सदर कार्यक्रम पार पाडल्यानंतर फाटलेले कागदी राष्ट्रध्वज तसेच प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज मैदानात,  रस्त्यावर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी इतस्त: पडलेले असतात. असे राष्ट्रध्वज पायदळी तुडविले गेल्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाच्या  वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये तरतुद नसल्याने त्याचा वापर करण्यात येऊ नये. प्लॅस्टीक बरेच दिवस नष्ट होत नसल्याने प्लॅस्टीकचे राष्ट्रध्वज त्याच ठिकाणी  पडलेले दिसतात. राष्ट्राच्या प्रतिष्ठेच्या दृष्टिने हि बाब गंभीर आहे.
कागदापासून तयार केलेले ध्वज महत्वपूर्ण सांस्कृतिक क्रिडा विषयक कार्यक्रमांच्या वेळी लावता येतात. अशा कागदी ध्वजांची कार्यक्रमानंतर विल्हेवाट लावण्यात  यावी असे ध्वजसंहितेत नमूद केले असून देखील राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचा दिसून येतो. इतस्त: पडलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व तहसिलदार यांनी  विल्हेवाट लावण्यासंबंधी गृह विभागाच्या सूचना आहेत. कार्यक्रम पार पाडल्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर, कार्यक्रमांचे  ठिकाणी पडलेले राष्ट्रध्वज नागरिकांनी जिल्हा, तालुका व गावस्तरावर असणार्‍या महसूल यंत्रणेकडे सुपूर्द करावेत. जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर सुपूर्त  केलेल्या राष्ट्रध्वजांची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.