Breaking News

पोलिसांनी विश्‍वासार्हता टिकवण्यासाठी कार्यपद्धतीत बदल करावा : मुख्यमंत्री

नागपूर, दि. 01 - पोलिसांना त्यांची विश्‍वासार्हता टिकवायची असेल तर कार्यपद्धती बदलावी लागेल, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडलं आहे. गुन्ह्यांमुळे पीडित महिलांसाठी नागपूर पोलिसांनी सुरु केलेल्या भरोसा सेलच्या उदघाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी आपलं मत मांडलं. इंग्रजांच्या काळातील पोलिसिंग आता चालणार नाही. तसंच लोकं पोलीस ठाण्यात येताना घाबरायला नको. त्यांना न्यायाचा पोलीस ठाण्यात मिळणार्‍या वागणुकीवर विश्‍वास असायला हवा असं स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. नागपुरात सध्या स्ट्रीट क्राईमसह व्हाईट कॉलर क्राईम वाढत आहेत. बदलत्या टेक्नॉलॉजीमुळे गुन्ह्यांचे प्रकार तीव्रतेने बदलत असताना पोलिसांनी ही स्वतःला बदलणे आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये पीडित महिलांना एकाच ठिकाणी पोलीस, वैद्यकीय, कायदेविषयक सेवा देण्यासाठी, पीडित महिलांच्या समुपदेशनासाठी नागपूर पोलिसांनी  विशेष भरोसा सेल सुरु केलं आहे. आयटीपार्क शेजारी स्थापन झालेले भरोसा सेल 24 तास सुरु राहील. या भरोसा सेलमध्ये कोणतीही महिला जाऊन मदत घेऊ  शकते. इतकंच नाही तर पीडित महिलांना याच ठिकाणी तात्पुरता निवाराही दिला जाईल.
विशेष म्हणजे गुन्ह्यामध्ये पीडित महिलांना एकाच ठिकाणी सर्व मदत मिळवून देण्याचा हा राज्यातला पहिलाच प्रयोग आहे. नागपुरात हे उपक्रम यशस्वी झाल्यास  राज्यभर त्याची अंमलबजावणी केली जाईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.