Breaking News

दोन मुलींचे विट्यातून अपहरण

सांगली, दि. 16 - कडेगाव तालुक्यातील शेळकबाव येथून विट्यात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी येत असलेल्या दोन अल्पवयीन शाळकरी मुलींचे दोन  तरुणांनी अपहरण केल्याची खळबळजनक घटना विटा येथे घडली. याप्रकरणी निलेश जालिंदर पवार व राम आप्पासाहेब कळसापनावर (दोघेही रा. वांगी, ता.  कडेगाव) या दोन तरुणांविरुद्ध अपहरणप्रकरणी विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 
शेळकबाव येथील दोन अल्पवयीन मुली विटा येथील दोन वेगवेगळ्या महाविद्यालयात अकरावी व बारावीत आहेत. सकाळी साडेसहा वाजता या दोन मुली पाडळी  ते विटा बसने नेहमीप्रमाणे विट्यात आल्या. परंतु, नेहमी दुपारी साडेबारा वाजता घरी परतणार्‍या मुली घरात आल्या नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध  घेतला परंतु त्या दोघीही सापडल्या नाहीत. त्यावेळी विट्यात शिक्षणासाठी येणार्‍या शळकबाव गावातीलच काही विद्यार्थ्यांनी या दोन मुलींसमवेत वांगी येथील  नीलेश पवार व राम कळसापनावर हे दोघे तरुण दिसल्याचे सांगितले. त्यामुळे मुलींच्या नातेवाईकांनी वांगी येथे जाऊन त्या तरुणांच्या घरी चौकशी केली.  त्यावेळी ते दोघेही तरुण घरात नसल्याचे समजल्याने मुलींच्या नातेवाईकांना संशय बळावला.
दुपारी मुलींच्या नातेवाईकांनी अज्ञात कारणावरुन दोन शाळकरी मुलींचे अपहरण केल्याप्रकरणी नीलेश पवार व राम काळसापनावर या दोन संशयित तरुणांविरुद्ध  विटा पोलिसांत फिर्याद दिली. तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक आशुतोष चव्हाण व उपनिरिक्षक ए. टी. सुनगार हे करीत आहेत.