Breaking News

राज्यातील शेतकर्‍यांना सातबारा घरात मिळणार : ना. पाटील

कराड, दि. 17 (प्रतिनिधी) : वर्धा आणि नाशिक जिल्ह्यांत आम्ही प्रायोगिक तत्त्वावर लोकांना घरबसल्या संगणकावर सातबारा काढण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. आता शेतकर्‍यांना 7/12 काढण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागणार नाही. महाराष्ट्रातील जमिनींची मोजणी करून प्रत्येकाच्या हद्दी ठरवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 
भाजपच्या वतीने रेठरे बु।, ता. कराड येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
सहकार महर्षी दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व्यासपीठावर राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, कृष्णा कारखान्याचे संचालक जगदीश जगताप, दयाराम पाटील, धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील, पांडुरंग होनमाने, डॉ. राजेंद्र पवार, सरपंच प्रविण हिवरे उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या दोन वर्षांत आम्ही अनेकांची दुकानदारी बंद केली असून, एकट्या सार्वजनिक बांधकाम विभागात चार ते पाच हजार कोटी वाचविले आहेत. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता भाजपा सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असून, याबाबत शरद पवार व नारायण राणे यांनी शिकवायची गरज नाही. एकेकाळी भाजपाच्या मदतीमुळे शरद पवार व नारायण राणे यांना सत्ता मिळाली होती, हेही ध्यानात ठेवावे.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, विकासासाठी भाजपाशिवाय पर्याय नसून शेतकर्‍यांबद्दल आस्था असणार्‍या या पक्षाचे नेते चंद्र्रकांत पाटील यांनी ऊसाच्या दराची कोंडी फोडल्याने शेतकर्‍यांना एफआरपी व्यतिरिक्त 175 रुपये जादा मिळू शकले. राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक गावे दुष्काळमुक्त झाली आहेत.
याप्रसंगी डॉ. अतुल भोसले, शेखर चरेगावकर, जगदीश जगताप, पैलवान आनंदराव मोहिते यांचीही भाषणे झाली. दरम्यान, कराड काँग्रेस महिला आघाडीच्या अध्यक्षा मधुमती पाटील यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसमवेत भाजपात जाहीर प्रवेश केला.
यावेळी व्ही. के. मोहिते, हणमंत धर्मे, घन: श्याम पेंढारकर, हणमंतराव जाधव, श्रीरंग देसाई, फत्तेसिंह जाधव, वसंतराव घोडके, मुकुंद चरेगावकर, यशवंत साळुंखे, बाबूराव यादव, जयवंत मोहिते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.