Breaking News

उ.प्रदेश निवडणुकीत जनताच भाजपला धडा शिकवेल - राज बब्बर

मुजफ्फरनगर, दि. 26 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्‍चलनीकरणाच्या घेतलेल्या निर्णयाचा फायदा त्यांच्याच काही निकटवर्तीयांना झाला आहे. परिणामी जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून उत्तर प्रदेशमध्ये होणा-या आगामी निवडणुकीत जनताच त्यांना धडा शिकवेल, असे प्रतिपादन उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राज बब्बर यांनी केले. उत्तर प्रदेशमधील पुरकाझी जिल्ह्यात एका सभेदरम्यान ते बोलत होते.
निश्‍चलनीकरणामुळे संपूर्ण देशाला परिणाम भोगावे लागत असून जनतेलादेखील या निर्णयाची झळ सोसावी लागत आहे. कपडे बदलल्याप्रमाणेच पंतप्रधान आपले निर्णय रोज बदलत आहेत. 10 लाखांचा सुट घालणारी व्यक्ती स्वत:ला फकीर म्हणून घेते हे एक आश्‍चर्यच असल्याचे राज बब्बर म्हणाले. पंतप्रधान मोदी हे दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले असून निश्‍चलनीकरणामुळे जनतेला समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे मत उत्तर प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष इमरान मसूद यांनी व्यक्त केले.