Breaking News

मळणगावात बळीची प्रथा बंद

सांगली, दि. 26 -  येथील यल्लम्मा यात्रेत दरवर्षीप्रमाणे बकर्‍याचा अमानुष पद्धतीने बळी देण्याची प्रथा या वर्षीपासून बंद करण्याचा निर्णय सांगली अंनिस,  अ‍ॅनिमलराहत व मळणगाव ग्रामसभा यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
गावातील यल्लम्मा यात्रेत बोकडाची अमानुष पद्धतीने तुकडे करण्याची प्रथा होती. या प्रथेचा उगम कसा झाला, हे गावास अज्ञात आहे. कारण गावात महादेवाची  यात्रा गोड नैवेद्य देऊन साजरी होते. मात्र यल्लम्मा यात्रेत खारा नैवेद्य म्हणून कर पद्धतीने बकर्‍याचा बळी देण्याची प्रथा होती. गावातील ही प्रथा बंद व्हावी, असे  नागरिकांचे मत होते. तसेच प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे हा गुन्हा देखील आहे. मात्र सांगली अंनिसचे डॉ. प्रदीप पाटील, अ‍ॅड. चंद्रकांत शिंदे, ज्योती आदाटे,  कौस्तुभ पोळ, प्रियांका तूपलोंडे, जावेद पेंढारी, सुभाष कोष्टी या कार्यकर्त्यांनी मळणगाव येथे जतचे पोलिस उपअधिक्षक नागनाथ वाकुडे यांच्या सूचनेने  प्रबोधनासाठी ग्रामस्था घेण्यात आली.
या ग्रामसभेत सरपंच रमेश भोसले यांनी ही प्रथा बंद व्हावी याच मताची मांडणी करुन पाठींबा दिला. ज्ञानेश्‍वर, तुकाराम या संतांची परंपरा असणार्‍या या  महाराष्ट्रातील आमच्या गावात असे प्रकार थांबवायलाच हवेत, असे मत निवृत्ती माळी, नेताजी भोसले, डॉ. नरेंद्र माही आदी ग्रामस्थांनी व्यक्त केले. यावेळी  गावातील शिवसेना तालुका उपप्रमुख संजय चव्हाण, दत्तात्रय क्षीरसागर, शिवाजी सकटे, पोलिस पाटील मनोजकुमार जाधव, अनिल भोसले व अंनिसचे करगणे  उपस्थित होते. कवठेमहांकाळ पोलिस उपनिरिक्षक निकम यांच्या उपस्थितीत सर्व ग्रामस्थांनी एकमताने ठराव करुन ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.  2 रोजी होणार्‍या या यात्रेदिवशी सोमवार हा महादेवाचा वार असल्याने अनेक महादेव भक्तांनाही या प्रथेस विरोध दर्शविला.
यावेळी कवठेमहांकाळ जायंटस् ग्रुप, सहेली ग्रुपच्या शामल कोष्टी, कल्याणी माळवरे, मीनाक्षी माने, जयश्री पाटील उपस्थित होत्या.