Breaking News

संत गाडगेबाबांच्या नावाचे विद्यापीठ व्हावे : प्रा. डॉ. गुरव

कराड, दि. 31 (प्रतिनिधी) : इयत्ता पहिली शिक्षण असलेले संत गाडगेबाबा यांनी दिलेले विचार आजही प्रेरणादायी आहेत. त्यांच्या नावाने राज्यात विद्यापीठ  होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन साहित्यीक प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांनी केले. कराड तालुका परीट समाज सेवा मंडळ यांच्या वतीने आयोजित 60 वी  पुण्यतिथी सोहळा व समाजाचा वधूवर मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. कॅप्टन बी. जी. शिंदे अध्यक्षस्थानी होते. नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे,  प्रतापराव शेडगे, बबनराव शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
प्रा. डॉ. गुरव म्हणाले, संत गाडगेबाबा यांनी त्याकाळी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची उत्तरे आजही मिळालेली नाहीत. गाडगेबाबांनी सुरूवातीच्या काळात सावकारी  पेशातून जनतेची सुटका करत माणसाला माणूस म्हणून जगण्याची बळ दिले. त्यांनी जाती भेद न मानता सर्वच स्तरातील लोकांना माणुसकीचा धर्म दिला. त्यांचे  विचार आजच्या पिढीसाठीही प्रेरणादायी आहेत. स्वच्छता, शिक्षण यांचे महत्व त्यांनी जाणले होते. समाजाला अंधश्रध्देच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी  त्याकाळात त्यांनी कार्य केले.
संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या सत्रात वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यास  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी विक्रमी वधूवरांची नोंदणी करण्यात आली. आनंदराव गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. आर.एस.रसाळ यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश जाधव यांनी  आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश जाधव, सुनील जाधव, धोंडीराम गायकवाड, शिवकुमार जाधव, चंद्रकांत गायकवाड, आनंदराव गायकवाड,  सुनील ठोंबरे, दिलीप नलवडे आदीसह संयोजकांनी प्रयत्न केले.