Breaking News

समृद्धी महामार्गातील बाधित शेतक-यांच्या विरोधाला शिवसेनेचा पाठिंबा - उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 26 - शिवसेना सरकारमध्ये सहभागी असली, तरी मी आणि माझा पक्ष शेतकर्‍यांच्या पाठिशी आहोत. शेतक-यांनी जमिनींबाबतचा विरोध कायम ठेवावा, शिवसेनेचा या विरोधाला पाठिंबा आहे, असे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातील सुपीक जमिनी सरकारला दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याच्या कारणास्तव शहापूरमधील शेतक-यांनी आज मातोश्रीवर जाऊन ठाकरे यांची भेट घेतली.
शेतक-यांच्या सुपीक जमिनी जाऊ देणार नाही. विकासाच्या नावावर सरकारकडून प्रकल्प उभारताना अनेक आश्‍वासने दिली जातात. मात्र कालांतराने ती पाळली जात नाहीत. सध्या शेतकर्‍यांना त्यांच्या सुपीक जमिनी बळकावल्या जात असल्याचे वाटत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि प्रकल्प समितीला भेटून शेतकर्‍यांच्या जमिनी वाचवून त्यात काही मार्ग काढता येईल का, हे पाहण्याचे आश्‍वासनही ठाकरे यांनी दिले.