Breaking News

भारताला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीचे जेतेपद, पाकिस्तानचा धुव्वा

क्वालालंपूर, दि. 02 - दिपावळीच्या मुहूर्तावर हॉकीच्या टीमने तमाम भारतीयांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. रुपिंदर पाल सिंग, अफ्फान युसूफ आणि निकिन  तिमय्याच्या गोल्सच्या जोरावर भारताने पाकिस्तानला 3-2 अशी धूळ चारली आणि आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले आहे.
भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची ही दुसरीच वेळ आहे. 2011 साली पहिल्यावहिल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत पाकिस्तानला हरवूनच  विजेता ठरला होता. तर 2012 साली भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.  दोन्ही वेळा भारताने पाकिस्तानचाच मुकाबला केला होता.
यंदाही अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तानमधला सामना अपेक्षेप्रमाणेच चुरशीचा ठरला. भारताकडून रुपिंदर पाल सिंगने 18 व्या मिनिटाला गोल केला तर  पाकिस्तानच्या मुहम्मद अलीम बिलालने 26 व्या मिनिटाला बरोबरी साधली. मग अफ्फान युसूफने 23 व्या मिनिटाला भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर पाकिस्तानच्या अली शाहने 38 व्या मिनिटाला बरोबरी साधली. अखेर 51 व्या मिनिटाला निक्किन तिमय्याने भारताचा विजयी गोल केला. या  विजयाबरोबरच भारतीय हॉकीपटूंनी मलेशियात जणू दिवाळी साजरी केली.