Breaking News

गंभीरला स्थान नाहीच, पुजाराने स्थान टिकवलं!

मुंबई, दि. 12 - न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. दुलीप करंडकात उत्तम कामगिरीद्वारे लक्ष वेधून घेणार्‍या गौतम  गंभीरला पुनरागमन करण्यात अपयश आलं. तर दुसरीकडे चेतेश्‍वर पुजाराला भारतीय संघात स्थान टिकवण्यात यश आलं. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील  राष्ट्रीय निवड समितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत टीम इंडियाची निवड करण्यात आली.
भारतीय संघाचं नेतृत्व विराट कोहलीकडे आहे, तर उपकर्णधारपदाची धुरा अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर असेल. भारतात होणार्‍या या कसोटी मालिकेसाठी रोहित  शर्माला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. तर शिखर धवनवरही निवड समितीने विश्‍वास दाखवला आहे. टीम इंडियानं नुकतंच वेस्ट इंडिजमधील कसोटी  मालिकेत 2-0 असा विजय साजरा केला होता. विराट कोहलीच्या टीमला आता मायदेशात येत्या सहा महिन्यांत 13 कसोटी सामने खेळायचे आहेत. भारताच्या  या परिक्षेची सुरूवात 22 सप्टेंबरला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनं होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भारतीय संघात कुणाला स्थान मिळतं याकडे सर्वांचं लक्ष होतं.
वेस्ट इंडिज दौर्‍यात 2-0 असा विजय साजरा केल्यानंतर टीम इंडियात मोठा बदल अपेक्षित नव्हता. मात्र काही खेळाडूंचा सध्याचा फॉर्म पाहता संघात त्यांना  संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.  फलंदाज गौतम गंभीरने त्याच्या फॉर्मने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र त्याला भारतीय संघात पुनरागमन  करण्यात अपयश आले आहे.
गंभीरने दुलीप ट्रॉफीत आतापर्यंत चार अर्धशतकी इनिंगची खेळी केली आहे. गंभीरने आतापर्यंत 80 च्या सरासरीने 320 धावा ठोकल्या आहेत. यामध्ये 77, 57,  90 आणि 94 अशा इनिंगचा समावेश आहे.
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के एल राहुल, मुरली विजय, चेतेश्‍वर पुजारा, रोहित शर्मा, शिखर धवन, आर अश्‍विन,  रिद्धीमन साहा, रवींद्र जाडेजा, भुवनेश्‍वर कुमार, अमित मिश्रा, उमेश यादव, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा