रणपिसे यांनी काढले भ्रष्ट मंत्र्यांचे वाभाडे
मुंबई, दि. 23 - खडसेंच्या प्रकरणातील भोसरीची जागा ही मूळ एमआयडीसीची आहे. त्या जागेच्या सातबा-यात आणि अॅनॅक्शर दोनमध्ये केवळ एमआयडीसीच्या नावाचा उल्लेख आहे. एमआयडीसीला अंधारात ठेवून या जागेचा व्यवहार करण्यात आला आहे. महसूल खात्याने या जमिनीचा घोटाळा केला. 65 कोटींची जमीन केवळ 3 कोटी रुपयांना विकण्यात आली, अशा अनेक गंभीर आरोपांचे दाखले देत काँग्रेस पक्षाचे गटनेते शरद रणपिसे यांनी फडणवीस सरकारमधील भ्रष्ट नेत्यांवर तोफ डागली.
शुक्रवारी विधान परिषदेत नियम 260अन्वये फडणवीस सरकारमधील जुन्या मंत्र्यांचे आणि नव्याने सामील झालेल्या मंत्र्यांचे घोटाळे यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेत रणपिसे बोलत होते. पुढे ते असेही म्हणाले, आप पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी खडसेंवर केलेले आरोप फडणवीस सरकारचे मंत्री किती भ्रष्ट आहेत, हे दर्शवितात. भोसरी प्रकरण हे त्याचे ताजे उदाहरण आहे. भोसरीमध्ये ज्या जमिनीचा व्यवहार झाला किंवा ज्या जमिनीवरून खडसेंना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले, त्या जागेचा मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे.