Breaking News

पीक कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन करावे - किशोर तिवारी

हिंगोली, दि. 19 - खरीप हंगामासाठी पात्र शेतकर्‍यांपैकी 80 टक्के शेतकर्‍यांना 31 मेपर्यंत पीक कर्ज वाटप करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार  हिंगोली जिल्ह्यास सन 2016-2017 करीता 960 कोटी एवढे पीक कर्जाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. परंतु, आतापर्यंत केवळ 34.14 टक्के इतकेच पीक कर्ज  बँकांनी शेतकर्‍यांना वितरीत केले आहे. तरी सर्व बँकांनी पीक कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन करावे, असे कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष  किशोर तिवारी यांनी निर्देश दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित खरीप पीक कर्ज आढावा बैठकीत श्री.तिवारी बोलत होते. यावेळी अप्पर  जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नईम कुरेशी, उपविभागीय अधिकारी सर्वश्री  राहूल खांडेभर्‍हाड, अमित शेंडगे, श्रीमती अनुराधा ढालकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.श्री.तिवारी म्हणाले, हिंगोली जिल्ह्यास 960 कोटी पीक कर्जाच्या  उद्दिष्टापैकी 750 कोटींचे उद्दिष्ट हे राष्ट्रीयकृत बँकाना होते. परंतु, राष्ट्रीयकृत बँकानी आतापर्यंत केवळ 226 कोटी 30 लाख कर्ज वाटप केले आहे. शेतकर्‍यांना  31 मे पूर्वी सदर पीक कर्ज वाटप होणे, अपेक्षित होते. कर्ज वाटप न केल्याने शेतकर्‍यांना खरीपाची पेरणी करता येत नाही. यामुळे या बँकाना नोटीस देवून  त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश श्री.तिवारी यांनी यावेळी दिले.