Breaking News

काले येथील ऐतिहासिक विहीर कोसळली

मलकापूर, दि. 19 (प्रतिनिधी) - नदीच्या पात्रातील बेसुमार वाळू उपशामुळे नद्यांची पात्रे काही ठिकाणी बदलली आहेत. महसुलाचा सर्वात मोठा वाटा असल्यामुळे या गौणखनिजाच्या निर्बंधाबाबत शासनाने नेहमीच कानाडोळा केला आहे. याच वाळू उपशाचा फटका कराड तालुक्यातील काले येथील दिवंगत स्वा. सै. पै. बळवंतराव देसाई यांच्या विहिरीला बसला. दक्षिणमांड नदीलगतच्या विहिरीच्या बाजूने सुमारे 30 फूट बेसुमार वाळू उपसा केल्यामुळे एका बाजूला मोठे भगदाड पडले असून विहीर निम्मी खचली आहे.
दिवंगत अँड़ भाऊसाहेब देसाई, अनंत देसाई यांच्या मालकीच्या विहिरीला शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक आठवणी आहेत. माजी सहकार मंत्री डॉ. एन. डी. पाटील, आ. गणपतराव देशमुख, आ. जयंत पाटील, आ. मिनाक्षी पाटील, माजी आमदार दि. बा. पाटील, दत्ता पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर आदि शेतकरी कामगार पक्षाच्या मंडळींच्या भोजनावळी व बैठकांची विहीर साक्षीदार आहे. गेल्यावर्षी राज्यभरातील जलपातळी खालावलेली असताना या विहिरीचे पाणी कमी झाले नव्हते. रेखीव आणि ऐतिहासिक वारसा जोपासणारी विहीर कोसळल्याचे परिसरातील लोकांनी दु:ख व्यक्त केले.