Breaking News

उत्पादन घटल्याने टोमॅटो कडाडला, भाव गेला 80 पार!

नवी मुंबई /सातारा, दि. 03 - दुष्काळामुळे केलेली लागवड शेतकर्‍यांना नाइलाजाने काढून टाकावी लागल्याने उत्पादन घटून टोमॅटोचे भाव कडाडले आहेत. गेल्या महिन्यात पंधरा ते वीस रुपये किलोने मिळणारा टोमॅटो या आठवड्यात तब्बल 80 रुपयांच्या पुढे गेला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील बागायती टप्प्यात टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हाच टोमॅटो मुंबई आणि पुण्याच्या घाऊक बाजारात जातो, परंतु गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने सह्याद्रीच्या पश्‍चिम घाटातील धरणांचा पाणीसाठा तळाला गेला आहे. यामुळे धरणांच्या पायथ्याशी असणार्‍या बागायत शेतीसाठी पाणी पूर्णत: बंद केले गेल्याने, फळभाज्यांची लागवडच शेतकर्‍यांना थांबवावी लागली. याचा सर्वाधिक विपरित परिणाम टोमॅटोच्या उत्पादनावर झाला आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोचे भाव वाढू लागले आहेत. मार्केटमध्ये 30 ते 35 ट्रक टेम्पोमधून सुमारे 1400 क्विंटलची आवक होत आहे. दोन महिन्यांपूर्वी हीच आवक तिप्पट होती. आवक कमी असल्याने घाऊक बाजारातील दर 40 ते 45 रुपये किलो झाला असून, किरकोळ बाजारातमध्ये टोमॅटो 80 रुपये प्रतिकिलो विकला जात आहे. पाण्याअभावी बागायतदारांना कोणतेच पीक घेता येईनासे झाले आहे. टोमॅटोला दर आठवड्याला एक वेळा पाणी द्यावे लागते. धरणांमध्ये तर पाणी नाही, तसेच वारंवार वीजकपातही होत असते. यामुळे बहुतांश शेतकर्‍यांनी टोमॅटोकडे पाठ फिरवली, तर अनेक शेतकर्‍यांना केलेली लागवड काढून टाकावी लागली, अशी व्यथा धनकडेवाडीचे (ता. वाई) शेतकरी सुरेश पवार यांनी मांडली.