Breaking News

बोल्हेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहा प्रसंगी लग्नसोहळा सपंन्न

अहमदनगर, दि. 19 - एमआयडीसीत मोलमजुरी करणार्‍या गरीब कुटुंबातील मुला-मुलीचा विवाह सोहळा भारतनगर, बोल्हेगाव येथे बोल्हेगाव, भारतनगर येथे श्रीराम सेवा समितीच्या वतीने श्रीरामनवमीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात पार पडला. या सामाजिक उपक्रमात मनपा सभागृहनेते कुमार वाकळे व समितीने पुढाकार घेतला होता. समितीच्या वतीने गेल्या 14 वर्षांपासून श्रीरामनवमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे सातत्यपूर्ण आयोजन केले जात आहे.
सप्ताहाच्या समारोपप्रसंगी तुकाराममहाराज कातोरे यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यांनतर हा लग्न सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर जेवणाचा म्हणजेच महाप्रसादाचा मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला. नवदाम्पत्यास समितीच्या वतीने सर्व उपयोगी भांडी व इतर संसारोपयोगी वस्तु भेट देण्यात आल्या. कांचन कांतीलाल विघ्ने (रा. पाथर्डी) व शरद तुकाराम पाखरे (रा. पाडळी) या वधू-वरांत हा विवाह झाला.  यावेळी आ. संग्राम जगताप, मोहन पडोळे, गहिनीनाथ बडे, उत्तम आडसूळ, रवींद्र खेडकर, हरिभाऊ गुंजाळ, मुरलीधर सुळे आदी उपस्थित होते. सततच्या दुष्काळामुळे शेती ओसाड पडली आहे. त्यामुळे चरितार्थ चालविण्यासाठी ही दोन्ही कुटुंबे बोल्हेगाव भागात वास्तव्यास असून, मोलमजुरी करून आपला संसार चालवित आहे. दोघांची परिस्थिती बेताची असून, श्रीरामनवमीचे औचित्य साधून श्री. वाकळे व श्रीराम सेवा समितीच्या माध्यमातून हा लग्न सोहळा संपन्न झाला.
आ. जगताप म्हणाले की, श्रीराम सेवा समितीचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. हरिनाम सप्ताह विवाह सोहळा हा दुग्धशर्करा योग असून, असे विचार समाजात रुजवण्याची गरज आहे. धार्मिक वारसा पुढे चालू ठेवत असताना समाजाला दिशा देणारे उपक्रम राबविणे व तरुण पिढीवर चांगले संस्कार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
यावेळी कुमार  वाकळे म्हणाले की, विघ्ने व पाखरे या गरीब कुटुंबातील वधू-वराचा विवाह लावायचा आहे. मात्र, पैशाअभावी अनेक अडचणी असल्याचे आमच्या लक्षात आल्यानंतर मी व श्रीराम सेवा समितीने पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा विवाह लावून दिला. हजारोंच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यापुढील काळात अशा प्रकारे समाजकार्य सुरूच राहील, असे ते म्हणाले.