Breaking News

भाजपचा हा कुठला राष्ट्रवाद आहे ? - प्रकाश आंबेडकर

नागपूर, 21 - जेएनयूमधील घोषणाप्रकरणी विद्यार्थ्यांवर केंद्र सरकारने देशद्रोहाचा आरोप ठेऊन गुन्हे दाखल केले आहेत. तर दुसरीकडे अफजल गुरूला हिरो म्हणविणार्‍या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीडीपी पक्षाशी युती करून भाजप सत्तेत सहभागी होतो. त्यामुळे भाजपचा हा कुठला राष्ट्रवाद आहे?, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरात बोलताना केली.  
आंबेडकर म्हणाले, केवळ घोषणा देणे देशद्रोह ठरत नाही. सरकारच्या विरोधात उठाव हा देशद्रोह ठरतो. त्यामुळे सरकारने त्यावर खुलासा करण्याची गरज आहे. रोहित वेमुला प्रकरणातही सरकारची भूमिका संभ्रमित करणारीच आहे. त्याची आई अनुसुचित जातीची व वडील ओबीसी आहेत. पती-पत्नी विभक्त असताना मुलगा आईजवळ राहात असेल तर तिची जात त्याला लागू पडते, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. पाकिस्तानबाबत मोदींची बॅकडोअर डिप्लोमसी अपयशी ठरली असून अमेरिकेने त्यांना विमाने देऊन त्याला छेद दिला आहे. हे अपयश झाकण्याठीच जेएनयूचा मुद्दा पुढे केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.